सकाळी ‘सात अट्ठेचाळीस’ ला भाऊ ताजा होता पेटलेला होता,
“अरे, एवढी जर लाज असेल ना आपल्या मराठीपणाची, तर वाढवा दाढ्या आणि….”
पुढले वाक्य भाऊ स्पेशल आहे. भाऊ पेटला का असाच बोलतो भाऊची बखर छापायची ठरवून सेन्सॉरबोर्डात टाकली तर एकही वाक्य पूर्ण छापता येणार नाही. पुन्हा ‘बखर’ या शब्दावरसुध्दा भाऊचा आक्षेप असेलच! अख्खी ‘सात अट्ठेचाळीस’ भाऊची नजाकत आणि अदा, अदब से पाहत होती. अख्खा कम्पार्टमेंट बोरीवली ते दादर रोज (रविवार सोडून) असाच असतो.
“अरे पण हिंदी पिक्चर पहायला आवडतात म्हणून काही लगेच आमच्यावर शस्त्रक्रिया करायची गरज नाही.”
आणखी एक चावी! भाऊने ढापण्या फडफडवल्या
“अरे पण हा साला नाना, मराठी चित्रपट डफ्फर असतात म्हणतो!... म्हणा! तुम्हाला सगळे खान लोक ....” पुन्हा तेच!
काय झालं होतं, सकाळी ‘सात अट्ठेचाळीस’ने बोरीवली सोडता-सोडता कुणीतरी मराठी चित्रपटांची करुन टाकली होती. भाऊची अस्मिता वगैरे दुखावली गेली होती आणि मायमराठीतून अस्खलित पट्टा सुरु झाला होता
अरे आपल्या अरुणने ‘श्वास’ काढला! ‘श्यामची आई’ नंतर पहिल्यांदा सुवर्णकमळ ! आता ऑस्करला चालला अरुण, आणि तुम्ही .... रडा!
भाऊला सबंध छापणं अशक्य आहे आमचे एक मित्रवर्य अरुण नलावडे मराठी चित्रपट निर्मितीत उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विजेते ठरले होते. श्वास बध्दल काय लिहावं? जिथे आणि जेवढा असायला हवा तिथे नेमका आणि तेवढाच भिडणारा श्वास. कटाक्षाने मेलोड्रामा टाळणारा श्वास. इमोशन्सचं धुणं धोबीघाटावर नेऊन पिळ पिळ न पिळणारा श्वास. गाण्यांचे मार्केट बाजूला ठेवणारा अव्यवहारी श्वास. प्रत्येक प्रसंग जरा ही न लांबवता कट्स साधणारा श्वास. साध्याशा कथेतून जीवनावर मोठे भाष्य साधणारा श्वास. खरंच श्वास मराठी चित्रपटांसाठी श्वासच ठरला आहे. या पार्श्वभूमीवर नानाचे वाक्य पचणे भाऊला जड जात होते.
“तू सांग ना! मराठी लेखक म्हणवतोस ना स्वत:ला?”
पारधी, भिल्ल, भटके आणि विमुक्त, या कॅटॅगरीत भाऊने मला यूं टाकले.
“मराठी चित्रपटांबध्दल तुझे काय मत आहे?”
मराठी चित्रपटांनी आणि संतांनी, एकेकाळी स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला होता असे माझे ठाम मत आहे. दोघांनी ही नको त्यांना, नाही ते समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण हे भाऊला सांगून उपयोग नव्हता.
“सध्या आपल्याला बरें दिवस आलेत.” मी डिफेन्सिव!
“तसं नको! मला सांग तुझा आवडता लेखक कोण?.. आता बघा सांगेल शेक्सपिअर नाहीतर हॅम्लेट!”
भाऊने सर्वांवर विजयी नजर फिरवत त्याला एकमेव ज्ञात अशा विदेशी साहित्यिकाला, त्याच्या अपत्यासह मध्ये घेतला.
“तसे बरेंच आहेत..” हॅम्लेट लेखक का नव्हता ? पुढे भाऊ नामक प्राणी आपल्यावर घसरेल म्हणूनच!
“सगळे परदेशी! मराठी एकतरी आहे का?”
“होते. एक भाऊ पाध्ये म्हणून..”
“आता हा भाऊ कोण?”
आपल्याला एक हमनाम प्रतिस्पर्धी आहे हे भाऊला ठाऊकच नव्हते.
“अरे, ते मराठीत फार शिवराळ लिहायचे!”
कुणीतरी मूलभूत माहिती पुरवताच,
“म्हणूनच याला आवडत असणार! …. काय वेळ आलीय पहा मराठीवर!”
भाऊ पुन्हा उधळला
भाऊ पाध्ये आवडतात हा अजून एक साहित्यिक गुन्हा! समकालिन मराठी साहित्यिकांत एकमेव वेगळा आणि म्हणूनच भावणारा लेखक. ज्याच्या कथेतील अनुभव आपल्याला सरळ छेदतात आणि कथेचा, तिच्या तटस्थ अविर्भावासह प्रवाह पाहून वेडं व्हायला होतं, असलं भन्नाट प्रकरण! आपल्या लक्षात त्यांच्या शिव्याच राहिल्या! आणि भाऊंचाही ‘संत’ झाला! यांच्या ‘शिव्या’ आणि त्यांच्या ‘ओव्या’! आणखी आपण काय लक्षात ठेवलंय?
“आता बोल ना! मराठी साहित्यिक म्हणवतोस ना स्वत:ला!?”
भाऊच्या तमाम शिव्या मी हसत झेलतो, पण ही सहन होणं शक्य नव्हतं!
“शिव्या देऊ नकोस! मुद्द्याचं बोल!”
माय रिवेंज टुवर्डस कंटेम्पररी मराठी लिटरेचर!
“..आणि पोरीला कुठे टाकलीयस? इंग्लिश मिडियमलाच ना! अरे, या चोर लोकांनीच तर मराठीची पार काशी करुन टाकलीय!”
मग कुणाकुणा लेखकांची मुले फॉरिनला आहेत, त्यांना मराठी अजिबात येत कसे नाही याची फोडणी मिळाली. प्रत्येक मराठी लेखकांने मायमराठीच्या ओसरीवर आपापली पोरे-बाळे बळी चढवलीच पाहिजेत असा एक निष्कर्ष सभेत एकतर्फी पास झाला. बहुतेक मतदाते लेखक नसल्याने त्यांनी आपली मुले अमेरिकेत पाठवण्यास काही हरकत नाही हे एक उपकलम होते… पण मी एकटाच होतो!
“अशानेच आपली भाषा बाटवली जातेय! संस्कृति बरबाद होतेय-”
“आणि धर्म बुडतोय!” एकमेव कट्टर हिंदूने संधी साधली.
“… अफगाणिस्तानात जाऊन रहा!” हिंदूंचा मूलतत्ववाद!
दादर येईपर्यंत हा संवाद वेगवेगळया मार्गाने मराठीची वाट लावणार्यांवर करवादत होता. दादर आले आणि भाऊ उठून दाराकडे सरकला,
“उतरनेका है क्या?”
मला माहीत आहे, स्थल-कालाचा तक्ता बदलून असे प्रसंग जागोजागी घडतात. आमच्यावर तर नेमाने बेततात. मराठीत चुकून काही लिहिलं तर तो गुन्हा ठरलेला आहे. आम्ही काय जपायला पाहत आहोत?
मागे एका नाटकाला इंग्रजी नाव दिले, समर्पक होते आणि गर्भितार्थ साधत होते.
“मराठी नाटकाला इंग्रजी नाव कशाला? मराठीत काय चांगली नावं मिळत नाहीत?” एक ज्येष्ठ साहित्यिक.
त्यानी त्या नाटकाला एक दोन मराठी नावं सुचवली. एकंदरच कठीण होतं!
“मराठी भाषा शुध्द लिहिली गेली पाहिजें !”
म्हणजे कशी?
“ती शुध्द बोलली गेली पाहिजे!”
पुन्हा!? कशी?
भाऊचा आणि मराठीच्या अस्तित्वाचा संबंध काय? भाऊने स्वत: सोडून इतरांना मराठीचे कातिल ठरवण्यामागचे सायको ऍनॅलिटिकल रीजनिंग काय? भाऊला सांस्कृतिक दादागिरी करण्याचा परवाना कुणी दिला? असे प्रश्न इथे विचारायचे नसतात. कारण आपली परंपरा उज्वल आहे, इतिहास सोनेरी आहे आणि साहित्य अत्युच्च दर्जाचे आहे!
आज जिला मराठी म्हणायचे ती काही शतकांपुर्वी ‘मराठी’ या नांवाने प्रचलित तरी होती का? त्या आधी कुठे होती? वापरात होती? एकूणच मराठी भाषेत परभाषेतून आलेले शब्द किती? ती कधी शुध्द होती का? किंबहुना आज जशी आहे तशी अवघ्या पन्नास वर्षंपुर्वी होती का? आजही ती सार्या महाराष्ट्रात एकाच पध्दतीने बोलली जाते का? या सार्यांची उत्तरे ‘नाही’ अशी आहेतं जगातील कुठलीही भाषा मुळात बोली असल्याने कोणत्याही काळी शुध्द असूच शकत नाही. आणि जी नाहीच आहे ती शुध्दता टिकवायचा कोण सोस!
मला वाटते, जेव्हा आपण मराठी भाषा आणि तिच्या शुध्दी विषयी बोलतो तेव्हा आपल्याला कागदावर लिहिली जाणारी लिपी आणि प्रचलित व्याकरण अभिप्रेत असते, बोली नव्हे. आणि जी शुध्दता जपण्याचा आग्रह होतो ती फारतर पाच पन्नास वर्षें प्रचलित असतें. पुन्हा बोलीनुसार व्याकरणालाही कालांतराने बदलावेच लागते. याचे दाखले कोणत्याही पन्नास वर्षे जुन्या पुस्तकात मिळतील. मग पन्नास वर्षांहून मागे जे व्याकरण अस्तित्वात होते ते आज अशुध्द मानायचे का? किंवा पुढे पन्नास वर्षांनंतर जी पध्दत अस्तित्वात असेल, ती जास्त शुध्द असणार आहे का? (केवळ उपयुक्ततेचा निकष लावायचा म्हटले तर प्रत्यक्षात या लिपीच्याच शुध्दिकरणाची आज गरज आहे, जेणेकरुन ती आजच्या डिजिटल की-बोर्डवर सुटसुटीतपणे बसवता येईल) बेसिक की-बोर्ड इंग्रजी वर्णमालेवर बेतलेला असल्याने ही आजची गरज आहे, असो.
आज आपण मराठीकडे कशा नजरेने पाहतो किंवा पाहता येईल, यावर विचार करुया. आज आपल्याला वाचनाचा कंटाळा आहे, किंवा वाचायला वेळ नाही. पुस्तकं कोण लिहितात किंवा ती कोण छापतात यापेक्षा ती कोण वाचतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मराठी पुस्तक जाते ते मुख्यत: ग्रंथालयात, लायब्ररीत. एक प्रत सरासरी हजारभर लोकं (वाचली तर) वाचतात. हा डिजास्टरस रेशो आहे आणि तो बदलणे शक्य नाही. यामागे दोन कारणं असावीत एकतर जेवढे फुकटात मिळेल तेवढेच साहित्य वगैरे वाचायची आपली मानसिकता किंवा जे छापले जातेय त्याची किंमत पुस्तकावर छापलेल्या किंमती एवढी नसण्याची खात्री. मग ठोस ग्राहक नसल्याने ग्रंथालयांच्या जीवावर तगणारी प्रकाशने. मग कमी प्रतिंचे एडिशन छापले जाणे, त्यामुळे पुस्तकाची किंमत वाजवीपेक्षा जास्त होणे आणि त्याच मुळे त्यांचे मुख्य ग्राहक ग्रंथालयेच असणे हे चक्र सुरु होते. आपल्याकडे सर्वात जास्त कोणती पुस्तकं विकली जातात? तर धार्मिक! हे सांस्कृतिक दारिद्रयाचे लक्षण आहे! त्या मागोमाग क्रम लागतो शैक्षणिक पुस्तकांचा. शिकून नोकर्या मिळवणे हा तर आमचा धर्म! शेवटी आम्ही! जे किती विकले जाईल याची शाश्वती नाही असे पुस्तक काढतांना प्रकाशक काय पाहतो? पुस्तकाच्या रचना आणि दृष्य रुपात दर्जावार कुठलीही तडजोड करायची नाही. कागद, छपाई वगैरे उत्कृष्ट असली पाहिजे, कमिशन दणदणीत दिलेच पाहिजे, एडजेस्ट कुठे कराल? लेखकाच्या मान (अवमान) धनात! मग ‘य’ दर्जाच्या मानधनाला ‘व’ दर्जाचे लेखक. चले-चलो भई चले चलो! लेखक कशाला लिहिल? ‘खाज’ हा ‘सन्माननीय’ अपवाद!
मी का वाचायचे? जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत भाषांतरीत होऊन आले तर मी वाचायचें, ओके. पण राजकीय, क्रीडा (अर्थी क्रिकेट) आणि नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकांनी थापेबाज चरित्रे लिहिली तर मी का वाचायची? खांडेकर-फडक्यांच्या फॉरमॅटमध्ये कादंबर्या भरघोस येतात. लग्न हे ज्यांचे एकमेव साध्य असते, त्या मी का वाचायच्या? वरकस जमिनीत तण माजावं, तशी कविता माजलीय! ती मी का वाचायची? ज्यांच्या उपजिविकेचे मुख्य साधन नोकरी आणि रविवार आरामखुर्चीत जातो त्यांच्या अनुभव विश्वाचं व्हॉल्युम काय? त्यातून किती कसदार साहित्य निर्मिती होऊ शकते?आणि झाली तर ती वाचणार कोण?
हे सारं बदलता येईल का? आणि कसें? आज आपले मराठी तंत्रज्ञ जगभर अनेक सॉफ्टवेअर्स बनवत असले तरीही मराठी ऑपरेटिंग सिस्टम अजूनही अस्तित्वात नाही कारण ग्राहकच फुकट्या आहे ई- क्रांतिचे वारें माय मराठीला अद्याप लागलेले नाही. ई-बुक्स, ई-न्युज किंवा ई-मॅगझीन्स आम्ही कधी प्रचारात किंवा प्रसारात आणणार? जर निर्मिती खर्च कमी झाला तर नक्की कसला दर्जा सुधारणार? आज मराठीच्या रचनेसाठी साधी एक स्टॅन्डर्ड की बोर्ड प्रणाली अस्तित्वात नाही ऑटो स्पेलचेक सारख्या सुविधा पॅकेज ओरिएण्टेड आहेत. मराठीत ऑनलाइन केलेली कामें ट्रान्सपोर्टेबल नाहीत. बाजारात उपलब्ध फॉन्टसही पन्नास साठ प्रकारचे आहेत, त्यांची एकमेकांशी सुसूत्रता नाही आणि बरेचसे परिपूर्ण ही नाहीत. एकाच भाषेसाठी सॉफ्टवेअर बनवणार्या कंपन्या एकमेकांना पाण्यात पाहतात. सुसूत्रता येणार कशी?
पण परिस्थिति कितीही प्रतिकुल असली तरीही कुणीतरी पुढे जाणे गरजेचे आहे. वाचकांनी, ज्यांच्या घरात आज संगणक आलेलाच आहे, त्यावर वाचनाची सवय करुन घ्यायला काय हरकत आहे? आपले लेख संपादकांपर्यंत आणि अंक वाचकांपर्यंत सॉफ्ट कॉपीमध्ये जायला काय हरकत आहे? दहा ग्रंथालये भरतील एवढी पुस्तके एका छोटया डिस्कवर राहणे शक्य आहें असे संग्रह घरोघरी होतील का? संदर्भ म्हणून अख्खे ग्रंथालयच आपल्या दारी हजर असेल का? मराठी साहित्याचा ओघ परभाषेत रुपांतरीत होऊन देशी विदेशी जाईल का? मराठी लेखक फेरारीमधून फेर्या मारेल का? स्वप्नांचं बरं असतं, इमले बांधायला पायाची गरज नसते! पण जोवर स्वप्न फुकटात पाहता येताहेत तोवर मी ती पहाणारंच! किती झालं तरी मी मराठी आहे! सर्वच क्षेत्रात होत असलेल्या संगणकीय महाबदलांचे मी हारातुर्यां शिवाय स्वागत करणार! या दृष्टीने ‘आम्ही मराठी’ ने ‘डिजिटल’ प्रकाशन सुरु करुन पुढे पाऊल टाकलेले आहें त्या निमित्ताने ‘आम्ही मराठीला’ हार्दिक शुभेच्छा
- आभास आनंद
आम्ही मराठी - दिवाळी २००४
No comments:
Post a Comment