Sunday, January 10, 2016

गोष्टी सांगणार्‍या माणसा/ प्रयोगाविषयी...


साधारण तीन महिन्यांपूर्वी, प्रयोग, मालाड या संस्थेच्या,प्र.ल. मयेकर स्मृति एकांकिका स्पर्धेचे आयोजन
आणि त्या निमित्ताने संग्रह, गौरव विशेषांक प्रकाशन वगैरे सुरू होते.
याच वेळेस अविनाश बोरकरने मला त्यांच्या मसीहा या संग्रहातील ‘गोष्टी सांगणारा माणूस’ या कथेविषयी सांगितले.
यात एक नाट्य आहे, जे राज्य स्पर्धेत प्रयोग म्हणून व्हावे, तू करावेस.
मी कथा वाचली, नेहमीची सुंदर शैली, दृश्यात्मक कथा. नाटक होईल- कदाचित, तेथे जातीचा नाटककार हवा.
त्याच वेळी कांचन नायकने याच संग्रहातील, ‘अखेरचा मसीहा', या कथेविषयी भरभरून सांगितले.
हीच कथा गिरीश ओकने स्मृति सोहळ्यात दोनदा वाचली.
अखेरचा मसीहा ही कथा, संग्रहातील पृष्ठसंख्या जुळावी म्हणून, उरलेल्या पानांसाठी लिहिली गेली, हे अवी बोलला.
अवघी पाच पानी कथा. मग विचार सुरू झाला, गोष्ट सांगणे ही देखील एक कला आहे.

मी शाळेत सातवी वगैरेंत असेन, वर्गात ऑफ पिरीयड मिळवा ही सर्वांचीच इच्छा.
असा तास मिळाला, तर कधी एखादा शिक्षक ‘आमचा’ असा आला, की आम्ही त्यांना गोष्ट सांगायचा आग्रह करायचो.
एकदा बाई म्हणाल्या, गोष्ट ठीक आहे, पण ती तुमच्यातीलच कुणीतरी सांगायला हवी. कोण सांगणार?
सगळा वर्ग माझ्याकडे पाहू लागला. मी उठलो आणि वर्गासमोर उभा राहिलो.
कोणती गोष्ट, मी काय सांगणार मलाच माहीत नव्हते. सुरुवात केली, मजेदार केली आणि अर्ध्या तासात संपवली.
मग हा पायंडाच पडला. ऑफ पिरीयड अचानक कधीही येई. गोष्ट सांगायची फर्माईश, मी उठून उभा, गोष्ट सांगे, ती मुलांना आवडेही.
ही गोष्ट तशी सोपी असे. व्यक्तिचित्रणे तयार होती, मुले एंटीसीपेट करीत.
‘टॉस ए सिच्युएशन’ टाईपची कथा असे, जी सिटकॉम करताना आपण वापरतो.
आधी तयारी वगैरे कधी केलीच नाही. प्रचंड वाचन आणि तरल कल्पनाशक्ति बस.

मग पुढे कधीतरी नाटकांसाठी लेखक वगैरे बनावे लागले. क्राफ्ट जमा करत गेलो.
जसजसा पुढे गेलो तसे, व्यक्तिचित्रण, प्रिमाईस, टोन, स्ट्रक्चर, लॉजिक, बॅलन्स,
रिलेवांस, से, ड्रामेटिक इश्यू, ड्रामेटिक स्टेटमेंट- वजनं वाढत गेली.
यातून लिहिणे अवघड होत गेले. लिहिले तेव्हा स्तुति, कौतुक होई, बक्षिसे मिळत, पण प्रयोग तिथेच संपे.
लिहिणे जड झाले होते, इतके मात्र निश्चित. कारण लोक मागत- माझे होत नसे.

त्या ‘गोष्टी सांगणार्‍या माणसा’चं काय झालं?
असा मलाच प्रश्न पडला आणि 'गोष्टी सांगणारा माणूस' ही मालिका जन्माला आली.
तिच्या पन्नास कथा लिहून या प्रयोगाविषयी लिहावे, असे मला वाटत होते,
पण मुद्दलात माझ्या गोष्टी सांगण्याच्या क्षमतेविषयीच एक शंका मनात आली होती.
आज तीस कथा सहज लिहून झाल्यावर ती मिटली, तेव्हा आता थांबायला हरकत नाही.

आता या प्रयोगाविषयी:

1) ‘गोष्टी सांगणारा माणूस’ ही मालिका लिहायला घेताना स्वत:साठी जास्तीतजास्त कठीण कशी करता येईल, हे पहिले.
कथा पूर्ण नसेल. सरळसोट नॅरेशन नसेल. समजायला अवघड नसेल पण विचार करायला उद्युक्त करेल.
विचार केला तर सबटेक्स्ट दिसेल, अन्यथा फक्त कथा वाचा, एंजॉय अशी पद्धत निवडली.

2) गोष्टी सांगणारा माणूस ०१ असे टाइप करेपर्यंत मला माहीत नसेल की मी कोणती गोष्ट सांगणार आहे.
पूर्वतयारी अजिबात नसेल, त्यामुळे रचनेचा प्रश्नच नाही. गोष्ट एकटाकी लिहिली जाईल आणि फ्लो मध्ये स्ट्रक्चर होईल.

3) रचना नसेल, त्याचप्रमाणे कॅरेक्टर्स रेखाटन नसेल. प्रत्येक कथा नव्या व्यक्तिरेखांसह, ज्यांचे चित्रणही होणार नाही.
म्हणजे, कॅरेक्टर्सच्याआड कथानकातील उणीवा झाकायचे स्वातंत्र्य मिळणार नाही.

4) कथेतील रचना, कॅरेक्टर्स रेखाटन आणि तपशील जाणीवपूर्वक टाळल्यावर फक्त गोष्ट उरेल.
त्या गोष्टीवर असलेला रॉनेस हाच तिचा यूएसपी राहील.

5) ही कथा प्रमोट होऊ नये, म्हणून ती अवेळी पोस्ट केली जाईल. बर्‍याच कथा रात्री बारा किंवा एकलाही पोस्ट झाल्यात.

6) यानंतर ज्या प्रतिक्रिया येतील त्या प्रेमाने आल्यात असे समजून त्यावर फार विचार करू नये.
गोष्टी सांगणे हा मूळ उद्देश, त्याला हरताळ फासू नये.

7) गोष्टी सांगणे, या प्रक्रियेचा मूळ हेतू, लेखकाची विचार क्षमता जागी ठेवणे आणि सातत्याने नवता देण्याची शक्यता राहणे ही असेल.

8) मूळ हेतू सिद्ध झाल्यास गोष्टी सांगणे या क्रियेला प्रयोजन राहणार नाही.
जरी ती बंद करणे हा आग्रह नसेल. अशा गोष्टी तहहयात सांगता येतील.
मात्र त्यात पुंनरावृत्ती अटळ असेल. त्यामुळे थांबणे हा सेल्फ डिसीप्लीन राहील.

9) रचनेतील अन्य तांत्रिक बाबी आपण नेहमीचं करत आलोत. त्याचा कंटाळाही येऊ शकतो. तेव्हा असे प्रयोग उपकारक ठरतात.

10) असो. नव्या वर्षात प्रवेशताना, शून्यातून सुरुवात करणे अनेकदा परिस्थिति आपल्यावर लादते.
आपण शून्यातून शून्याकडे जातोय याची आपल्याला कल्पना असल्याने तो काही मोठा इश्यू होत नाही.
ज्यांनी या कथा वाचताना, वाचून संपर्क साधला, चर्चा केली, आवडले, कळाले नाही, नावडले,
असे स्पष्ट संगितले त्या सर्वांचे आभार, कारण या प्रयोगात तुमचा फीडबॅक हाच महत्वाचा मुद्दा होता.

धन्यवाद!
-Aabhas Anand

३०. गोष्टी सांगणारा माणूस ... बळिराजाचे राज्य.


आज ही सांगणं भाग आहे. उद्या या प्रयोगाविषयी...before winding up.
माणूस हा एक जनावर आहे. जनावराच्या सर्व प्रेरणा त्याच्यातही आहेत.
आहार,निद्रा,भय, मैथुन या मुख्य प्रेरणा ‘स्व’ शी निगडीत आहेत.
त्यामुळेच जेव्हा तो स्वत:पुरता विचार करतो तेव्हा तो या पैकी एका भावनेचे चलन असतो.
यांचे शमन करतानाही तो 'स्व' निष्ठ असतो. मात्र या प्रेरणा सहजसिद्ध होण्यासाठी आवश्यक सुरक्षा तो कळपात राहून मिळवतो.
प्राणी हे समूहजीवन जगतात. त्यांत एक प्रकारची सुरक्षा आहे.
ही सुरक्षा मिळवताना त्यातील प्रत्येकाला काही किंमत चुकवावीच लागते.
उदा. कमजोराला बाहेरून होणाऱ्या हल्ल्यात आधी बळी जावे लागते.
तसेच बलवान म्होरक्याला बाहेरून होणारा हल्ला, स्वत: जीवाची बाजी लावून परतवावा लागतो.
समूहातील मादी, सर्वोत्तम आणि सबल नराला प्राप्त होते आणि तिला मात्र कधीही दुसर्याच सबल नराच्या कह्यात जावे लागते.
समुहाचे नियम असतात. ते निमुटपणे पाळणारा या समुहाचा सभासद राहू शकतो.

हे नमनालाच घडाभर तेल यासाठी की जेव्हा आपण माणूस नावाच्या, समुहातच राहणाऱ्या जनावराकडे पाहतो,
तेव्हा हे नियम पार उलटे-पालटे झालेले पाहतो. याला कारण त्याची बुद्धी आहे हे निश्चित.
या बुद्धीने त्याने समाज बांधला, त्याचे नीती-नियम बनवले आणि ते पाळावेत म्हणून बंधने, कायदे-कानून तयार केले.
हे करताना उद्देश हा होता की समूहाचे संकेत सर्वांना मान्यच असावेत- जर कधी एखादा ते तोडेल, तेव्हा कायद्याचा वापर व्हावा.
अशा आदर्श स्थितीत आपण सुरुवात केली असेल- ती आज कुठवर पोहोचली आहे?
तर माझा मित्र बळी पिळया म्हणजे, बळीराज पिळणकर, (याला पण यापुढे सोयीसाठी बळी-पिळयाच म्हणू.)
हा राजवंशात जन्माला आल्याने बळीराजाचे राज्य त्याच्यापुरते आलेले आहे.
बळी-पिळयाचा बाप झेडपीच्या अनेक कमिटयांवर चेयरमन आहे.
चार-दोन हॉटेल्स आहेत वर गॅस एजन्सी. त्यामुळे व्होल जिल्ह्यात त्याची चालते.
असा बळी मला मानतो हे एक आश्चर्यच. म्हणतो-
"यार, कधी काय ट्रबल आला की, तुला फोन लावतो. तेरे पास हर मर्ज की दावा होती हय दोस्त."
कपाळ! याला काय सांगणार वैद्याची गुटी, त्याला स्वत:च्या कामी येत नाही.
पण तो आपल्याला मानतो ही साची बात. म्हणजे आपल्यात पण कायतरी सॉलिड दुर्गुण असणारच!
अशी मी आपली समजूत काढून घेतो.

 "यार तू बाकी एकदम ओके आहेस, सिर्फ एक लफडा आहे तुझ्यात."
"काय तो बळी?"
"तुझा भरोसा देता येत नाय कधी. ठीक असलास, तर किंग जॉर्ज आणि बिनसला तर चंगीजखान ! काय गॅरेण्टी नाय तुझी."
"ती दुनियेत कसलीच मिळत नाय रे. चायनीज मालाचीसुद्धा!"
"बाईची गॅरेण्टी देता येते काय?" बळी थोडा टेन्स दिसला.
"काय येडा आहेस काय? एकवेळ चायनीज मालाची गॅरेन्टी देता येईल!"
"मग काय करायचं, ते सांग!"
"मला आधी वार्ता काय ती अगडम-बगड्म सोडून सांग."
बळीपिळ्याच्या हॉटेलात ही वार्ता सुरू होती, म्हणून त्याने दोन चिकन टीक्के स्टार्टर म्हणून मागवले, आणि पोराला स्टफ सांगितला.
"आज इथूनच जेवून जायचं, मी सांगतो वयनीला."
"नाही, ठीक आहे. तिला कल्पना दिलीय मी." आता वयनी कशाला मध्ये?
मग बळीपिळ्याने त्याची इस्टोरी टाइटल सकट सांगितली.

बळीपिळ्याच्या बापाच्या कुठल्यातरी झेडपी कमिटीतल्या एका सभासदाच्या पोराचं शिकायला गेला तिथे एका पोरीशी जमलं होतं.
पोरगी जरा ‘सभ्भे’ घराण्यातली होती. म्हणजे नावावरून तसं वाटत होतं.
आता या मेंबरचा पोरगा खानदानी असला, तरी सुसंक्रूत कसा दिसायचा?
म्हणून बळीच्या बापाने बळीला जरा ताम-झाममध्ये पोरा सोबत जायला सांगितलं.
बळीने पोरं जमा केली. एक स्कॉर्पिओ बळीची सवारी आणि पाच बुलेटी.
स्कोर्पिओ यायच्या आधी सायलेंसार काढलेल्या बुलेटी यायच्या.
रस्त्यावरचाच काय, दुकाना-हॉटेलातला माणूस पण चमकून बघायचा. कौन जा रहा हय?
अशे पहाटेचे निघाले. बुगुर्र बुग बुग बुग बुग... फाड फाड फाड फाड फटाक फाड फाड... गेले.

पोरीच्या घराजवळ पोचले तेव्हा वाजले होते सकाळचे अकरा.
अचानक तो शांत एरिया फडाडून उठला. लोक बाल्कनी, विंडो मिळेल तिथून पाहू लागले.
पोरीची माय आणि बाप बाल्कनीतून. च्यायला असा जावई पाहिजे! काय आलाय-काय आलाय!
बळीपिळयाचे अग्रदूत बुलेटी स्टँडला लावून धावले. त्यांनी बळीपिळ्याला दरवाजा उघडून कुर्निसात केला.
बळीचा रूबाब असा की जसा खासदारच उतरला. वधुमाय म्हणते, जावईबापू छानच!
मागे ते मरतुकडं डॉक्टर होऊ घातलेलं, बाहेर आलं त्याची कुणालाच पडली नव्हती. सारा शो बळीपिळ्याचा.
पोरीच्या घरात सगळे सेट झाले. पोरीने कायद्याने कांदेपोहे आणले. बळीपिळ्या हलला!
त्याला बच्चन द्यायची होती. घे SSS सुटला तो! साला पोराची मार्केट करायची तर कोण करूच देना त्याला.
सगळे त्याचीच खबर काढतायत. हा ही सुटला.
तुला चाळीस खाटांचं हॉस्पिटल बनवून देतो! बोलला.
लोक खुश दिसत होते- पण मध्येच नवरा मुलगा दाखवला. बोंबला! चेहरेच उतरले ना तिथले.
कुस्ती मारल्याच्या नादात बुलेटी सुटल्या, ते थेट झेडपी ऑफिस. बाप आणि त्याचे चमचे इंतेझार करत होते.
त्यांना दिल्ली काबिज केल्याची खबर दिली आणि सुटले.

पुढे दोन हफ्ते काहीच प्रोग्रेस नाही. पोराचा बाप घायकुतीला. अरे काय कळवलं नाही त्यांनी?
आम्ही काय अड्डम सड्डम आहोत का? एकदम प्रेस्टिजचा सवाल झाला. दोन हफ्त्यांनी पोरीचा फोन.
कुणाला? बळीपिळ्याला! आता बोला!
म्हणते, “ह्याचं माझं जमणार नाही, हे समजलंय मला.”
बळीपिळ्या त्या पोरीला समजावतोय,
“अरे असं करू नको हो! आम्ही काय कमी ठेवणार नाय. सगळं व्यवस्थित करू.” वगैरे.
पण पोरगी ऐकायला मागे ना. पण एक दिवसाआड तिचा फोन बळीपिळ्याला.
तिला समजावताना नाकी नऊ नाही, दहा,वीस बत्तीस आले बळीच्या. त्या पोरीने चक्क नकार दिला हो! कारण???
 ... अता नाय पता! पोराला, बापाला समोर घेतला, काय ते बोल. पोर अळीमिळी. हात तुझ्या!

एक वर्षाने बळीपिळ्याचा बाप पोराची पत्रिका गावभर वाटत होता. सांगत होता सुनबाई डॉक्टर आहे.
लग्नाची आणि चाळीस खाटांच्या हॉस्पिटलची तयारी एकसाथ सुरू. बळीपिळ्या फॉर्मात, कारण टोळीचा नियम.
सरदार एकच असतो. शादी झाली आणि हॉस्पिटल खुललं. ते पोरगं आता त्याच हॉस्पिटलला नोकरीला आहे.
सवाल ये हय की फंडामेंटल कुठे गेलं?

लक्षात घ्या, आपल्या सगळ्या अकलेसकट फंडामेंटल तेच आहे!