Monday, April 18, 2016

३१. गोष्टी सांगणारा माणूस.

शेजारच्या पोरी, पण बघायची चोरी.

  आमचा काळच और होता. कोणता मुहूर्त पाहून आम्ही त्या काळात जन्म घेतला माहीत नाही. पण आमच्या आधी सर्व मुलं-मुली, छान-निरागस आणि आमच्या नंतर सगळं फ्री आणि कॅज्युअल होतं. 

हे मी आमच्या मैत्रिणींबद्दल बोलतोय. मैत्रिण ही त्या काळात नुसती यायची नाही, तर ती वर्ग मैत्रिण बनून यायची. त्या बाहेर ती नसायचीच. सोसायटीत ती असली, तर बोलायची टाप नव्हती. कुठेही गल्लीत, मंदिराच्या पटांगणात, सोसायटीच्या हॉलवर, लायब्ररीत, जाता-येता, कुणी बोलताना सापडलं की थेट घरी खबर. पोरांच्या नाही- पोरींच्या. त्यामुळे आम्ही बोलायला गेलो, तरी पोरी बोलायलाच मागत नसत. वर्गात एक वेळ ठीक. एकत्र शिकायचे असल्याने जुजबी बोलणे व्हायचे. पण ते ही, "पट्टी दे", "रबर आहे?", "तुझी वही मा‍झ्या हद्दीत येतेय" किंवा "बाईंना ना SSS व", एवढेच. अशातच आमची प्रथम मैत्रिण जन्माला आली. म्हणजे ती जन्माला आमच्या सोबतच आली असणार. थोडी पाठी- पुढे. पण ती मैत्रिण मटेरियल आहे, हे कुणालाच माहीत नव्हते. आम्हालाही- तिलाही. त्यामुळे इयत्ता चौथीत वगैरे, आपली मैत्रिण आपल्या बाजूला पाच तास बसते आहे, यातले सुख कळलेच नाही. तिचे काम एवढेच असे की, " गृहपाठ कुणी-कुणी केला नाही?" ( हे वाक्य बाई बहुतेक आम्हाला बघतच म्हणायच्या) असे विचारले की आम्ही उठून रोजची पट्टी खायला जात असताना आम्हाला जागा करून देणे. पुढे मोठे झाल्यावर पश्चाताप झाला की, या मैत्रिणीशी तेव्हा मैत्री करायची संधी असताना आम्ही फक्त भांडणे का केली? 
पण असो.

संध्याकाळी आमच्या या मैत्रिणी, खेळायच्या निमित्ताने एकत्र येत. मुलं-मुली एकत्र खेळायचो. सोनसाखळी, लंगडी, खो-खो, अमृत-विषामृत, लगोरी  किंवा बेस्ट म्हणजे चोर-शिपाई. यातही मैत्री कमी- भांडणेच फार. अशाने कशी मिळायची मैत्रिण? अचानक सातवीत आलो आणि रूल्स बदलले. तसे ते बदलतील, हे आम्हालाच माहीत नव्हते. वर्गात मुलं-मुली असे दोन तट पडलेच, पण एकत्र खेळायला येणार्‍या मुलीही बंद झाल्या. हे काय झाले ते आम्हाला कळले नाही, आणि त्यावर विचार करायला आमच्यापाशी वेळही नव्हता. आम्ही तोवर क्रिकेट टीम तयार केली होती, स्कुल चॅम्पियन होतो. शाळेतील खो-खो टीममध्ये होतो. तिथेेही चॅम्पियन. मरोत मैत्रिणी.

अशाने मैत्रिणी हा शत्रू पक्ष झाला आणि आम्ही वयात आलो. साला वर्गात आखडणारी आणि वर टॉप मार्क्स मिळवणारी काय मैत्रिण होणार? त्यामुळे दोन्ही पार्टीजनी इंटरेस्ट दाखवला नाही. मुलींनी अभ्यासात डोके खुपसले, आम्ही खेळात. आता जेव्हा, ‘जवानी छा जाती है, तब गधी भी घोडी नज़र आती है।' या उक्तीप्रमाणे, आमचीच मैत्रिण आम्हाला अजनबी नजर आने लगी. आम्ही तिच्याकडे चोरून नजरा टाकू लागलो. यथाकाल तीही चोरटे कटाक्ष फेकू लागली. बस ! एवढंच! या पलीकडे काही होतच नसे तेव्हा. वेळही नव्हता. आमचा कार्यक्रम सकाळी अभ्यासाची हेलपाटी टाकणे, नंतर बाराला बुट्टयाच्या घरी झोपाळ्यावर. तिथून साडेबारा शाळेत. सहाला शाळा सुटली की मैदानात. पवार सर मातीत घोळवायचे. साडेसातला घरी. मग वाचन- नंतर जेवून झोप. शाळेत प्रॅक्टीस नसेल तेव्हा क्रिकेट. पुढे कॉलेजला गेल्यावर, फूल डे इंजिनियरिंग, तिथून कॉलेजची नेटस, नसतील तेव्हा धावत मैदानावर, लास्ट हिटाउट ऑर गेटआउट इनिंग मिळायची. रविवारी- सकाळी पार्कात बेकन फॅक्टरीपर्यंत जॉगिंग. दहा ते बारा  अधिकार्‍यांच्या विहिरीत डुबक्या, चारला जीममध्ये घुमून पाचला क्रिकेट ग्राऊंड. बिचार्‍या मैत्रिणी.

मग मैत्रिण कधी? तर क्लासला जाता किंवा येताना. त्याने काय होतंय? त्यामुळे सार्‍या गॅंगने विचार केला की, काहीतरी करायला पाहिजे. अशाने जमायचे नाही. मग आम्ही काय केलं, एक-एक पोरगी प्रत्येकाने आपल्या चॉइस प्रमाणे  बुक करून टाकली. म्हणजे याची गोगोपा, त्याची भुईचक्र, एक उलट्या पीसांची कोंबडी, एक कंबाईन, एक तिची बॉडीगार्ड. एक ताईसाहेबा. पण हे बुकिंग म्हणजे नुसतेच रमीतले 'बारा बुक' . प्रत्यक्षात हाती 'नो टच' गेमच असायचा.  आमचे गाणे ही होते, ‘आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म’च्या चालीवर. 'बारा बुक असू दे किंवा नो टच गेम असू दे. गेम न कधी दाखवी SSS ढुबूम ढुम ढुम- ढुमचिक ( हे जगाच्या अंतापर्यंत किंवा श्वास संपला की-) गेम न कधी दाखवी तयाला बंडूगिरी म्हणती- तयाला बंडूगिरी म्हणती. या प्रमाणे आमचे पान कधी उपडे पडलेच नाही. साला पायावर धड उभे राहत नाही तोवर या सो कॉल्ड मैत्रिणी संपल्या. संपल्या म्हणजे त्यांच्या बापांनी त्यांची लग्ने लावून दिली. या बापांनाही इंटरेस्टिंग नावे होती. सूर्याजी, ढाक्या, आय. एस. जोहर, टोणपे वगैरे. आम्ही नेक्स्ट बॅच म्हणत बॅच आफ्टर बॅच पास होऊ दिल्या. नो युज! साला पिकतं तिथे विकतच नाही. आम्ही आपली समजूत करून घेतली. अशा रीतीने आमच्या शेतातलं, आम्ही मेहनतीने पिकवलेलं पीक, टोळधाडीने लुटून नेलं. टोळधाडीचे  क्वालिफिकेशन? मोठा बाप किंवा, शिक्षण किंवा फक्त विशिष्ट जमातीत जन्म घेणे. साला, सारा चमन उजड गया. अशावेळी आम्हाला सपोर्ट केला, तो विजय माल्ल्याने. तो होता म्हणून वाचलो. तर असे क्लास 'सी' जेंडरल इंसुलेशन असलेल्या काळात आपण मुळात जन्मच का घेतला? असो.


पुढे घरी 'रोटीयों के लाले' पडतील अशी लक्षणे दिसू लागल्यावर आम्ही लग्न करायचे ठरवले. मग त्या काळात उरलेल्या मुलींशी आम्ही लग्ने केली. दिवसा नोकरी, संध्याकाळी नाका आणि रात्री संसार असे डिस्ट्रिब्युशन केले. सणासुदीला कधी आमच्या मैत्रिणी येत, त्या कधी बोलल्या तर ठीक, नाहीतर लांबूनच हसून पसार ! हाड तिच्यायला ! मैत्रिणीशी साधा एक शब्द बोलता येऊ नये? तसा तो आधीही येत नव्हताच. 
भंगार काळ!


असा बराच काळ गेला. मैत्रिणींची मुले मोठी होऊन त्यांच्या नवर्‍यांची पोटे सुटली किंवा ते म्हातारे दिसू लागले. आम्हाला यात आसुरी आनंदच झाला. तरी पण या काही आमच्याशी मैत्री करेचनात. मग सगळे करतात तो एक प्रकार केला. गेट टुगेदर. आपल्या मैत्रिणी पुन्हा पाहण्याचा एक नामी उपाय. जमला. नवी नावे, पत्ते, नंबर्स कळले. भेटत राहायचे नक्की झाले आणि खतम. पुन्हा काही कोणी भेटायचे नाव काढले नाही. काही भूमिगत झाल्या, काही गुडुप झाल्या. काय झाले, काय माहीत.

बुट्टया बिचारा जीवतोड मेहनत करायचा की सगळे एकत्र यावेत. तीन-चार महिन्यातून एकदा भेटावेत. पण नाही. जखमेवर मीठ म्हणून आमच्या आधीच्या आणि नंतरच्या बॅचेस येतं जाता भेटत. त्याचे फोटो फेसबुकवर अपलोड करत. आमचे मात्र नन्ना! तमाम संस्कृती, शालीनता, मर्यादा ही या आमच्या एका बॅचमध्ये एकवटलेली. आम्ही अचानक मित्राचे- परपुरूष झालो होतो. मोठ्या मुश्किलीने एकदा भेटलो- नंतर बंद. आपलेच असे का झाले? कालच बुट्ट्याशी बोलत होतो. मी म्हणालो, “आपल्या बॅचला बुट्टया, सगळ्या नेफर्टीटी, क्लियोपात्रा नाही तर रझिया सुलतान असणार. त्यामुळे आपण फक्त त्यांचे पुतळेच पहायचे.”

बुट्टया म्हणाला, “अरे, कदाचित त्यांना त्यांच्या नवर्‍यांची खात्री नसेल. शेवटी बायकोचा मित्र सहन करणे, ही एक कला आहे.”

 पण आमच्या दुर्दैवाचे दशावतार असे की, आमच्या बायकांना मित्र आहेत पण आमच्या मैत्रिणी, लाश गायब!!

“अरे! पण फक्त आपल्या बॅचच्या मैत्रिणींनाचअसे अरसिक नवरे मिळावेत! आपल्या पुढे-पाठी सगळे आधुनिक?”

बरं यांचे नवरे प्राचीन तर मग आपण अर्वाचीन कसे? तर याचे कारण विजय माल्ल्या! जगातील सारे भेदभाव मिटवते अशा औषधाचा निर्माता! जय किंगफिशर ब्रूवरीज !!


विचार आला, शेयरच्या जशा तीन वॅल्यूज असतात, एक बुक वॅल्यू, दुसरी फेस वॅल्यू आणि तिसरी मार्केट वॅल्यू. तशा यांच्यापण तीन वॅल्यूज आहेत. म्हणजे यांच्या नवर्‍याकडे यांची फेस वॅल्यू . ती स्प्लिट होत-होत आता एक रुपया झाली असणार! आई—बापा घरी बुक वॅल्यू- जावयाची पोस्ट, पगार, नातवंडांची हुशारी आणि आर्थिक स्थितीवर बेतलेली. मित्रांकडे येताना मात्र मार्केट वॅल्यू? ती पण बुल मार्केटमधली ?  अव्वाच्यासव्वा वाढवलेली? आमच्या नंतरच्या बॅचमध्ये गळयात गळे घालून सेल्फी काढतात. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही मात्र एका गेट टुगेदरसाठी फोन झिजवायचे. कशासाठी? तर फक्त या नेफर्टीटी, क्लियोपात्रा किंवा रजिया दिसणे- या एका क्रियेसाठी? मी बुट्टयाला म्हणालो, “यांना परत एकदा गेट टुगेदर करायचे आहे, म्हणून सांग. सांग, वाटल्यास पर्दानशीन होऊन या. आम्ही आपल्या पायांची बोटे पाहून समाधान करून घेऊ. वाटल्यास मुँह दिखाईचे तिकीट ठेवा. आम्ही दोनशे रुपये खर्च करून, तिकीट काढून आपले दर्शन घेऊ. बरे हे सारे कशासाठी ? तर फक्त आम्ही पाहू म्हणून !? काय होते पहिले की? संस्कृती बुडित जाते? मा‍झ्या माहितीप्रमाणे, नुसते पाहून कुणी प्रेग्नंट झाल्याची इतिहासात नोंद नाही. ते ही या वयात!”


एखाद्या बॅचला जन्म घेऊन, आपल्या आधी आणि नंतर, सगळे सुखात सोशलतायत आणि आपण मैत्रिणीच्या एका शब्दाला महाग आहोत, ही भावना किती वाइल्ड आहे! चोर, दरोडेखोर किंवा जॅक द रिपरच्या मालिकेत आपण उभे आहोत, असे फीलिंग येते! संपूर्ण आयुष्य मैत्रिण नसणे आणि सहाराच्या वाळवंटात जन्म घेणे, यात फरक तो काय? लोकांना भरभरून मैत्रिणी देणारा देव, आम्ही त्याच्या दारी चाळणी घेऊन गेलो, तेव्हा काय झोपला होता? फ्रॉइड म्हणतो की एखाद्या गोष्टीची मानसिक कमतरता भासत असेल, तर मन ती कल्पनेने सोडवते. अशी कल्पनेतून सोडवण्याची व्यवस्था नसती, तर माणसे पार वेडी झाली असती. आमच्या मैत्रिण दुष्काळावर अशीच एक कल्पना मला सुचते आहे. मादाम तुसाँ फाउंडेशनकडे रिक्वेस्ट करून या नेफर्टीटी, क्लियोपात्रा, रझिया वगैरे मैत्रिणींचे मेणाचे पुतळे बनवून घ्यावेत. काळाच्या प्रतलावर गोठलेले. मग आमची ती मैत्रिण, शाळेच्या युनिफॉर्म मधली, पंधरा वर्षांची असली तरी हरकत नाही. किंबहुना तिने पंधरा वर्षांचेच असायला हवे. अजिबात वाढता कामा नये. त्यांचे प्रदर्शन भरवावे. आम्ही ते तिकीट काढून पहायला जाऊ. युनिफॉर्म मधली चिमणी पाहून, नॉस्टॅल्जिक होऊ. दिवसभर त्यांच्याशी पट्टी- रबरावरून भांडू. संध्याकाळी प्रदर्शन बंद होताना, वॉचमनकडून बाहेर काढले जाताना, तिथल्या शेरेवहीत लिहू, 

“आज हमे आफताब नजर आया, अब हमे जन्नत नसीब होगा! इन्शाल्ला !”    

                             *******

Sunday, January 10, 2016

गोष्टी सांगणार्‍या माणसा/ प्रयोगाविषयी...


साधारण तीन महिन्यांपूर्वी, प्रयोग, मालाड या संस्थेच्या,प्र.ल. मयेकर स्मृति एकांकिका स्पर्धेचे आयोजन
आणि त्या निमित्ताने संग्रह, गौरव विशेषांक प्रकाशन वगैरे सुरू होते.
याच वेळेस अविनाश बोरकरने मला त्यांच्या मसीहा या संग्रहातील ‘गोष्टी सांगणारा माणूस’ या कथेविषयी सांगितले.
यात एक नाट्य आहे, जे राज्य स्पर्धेत प्रयोग म्हणून व्हावे, तू करावेस.
मी कथा वाचली, नेहमीची सुंदर शैली, दृश्यात्मक कथा. नाटक होईल- कदाचित, तेथे जातीचा नाटककार हवा.
त्याच वेळी कांचन नायकने याच संग्रहातील, ‘अखेरचा मसीहा', या कथेविषयी भरभरून सांगितले.
हीच कथा गिरीश ओकने स्मृति सोहळ्यात दोनदा वाचली.
अखेरचा मसीहा ही कथा, संग्रहातील पृष्ठसंख्या जुळावी म्हणून, उरलेल्या पानांसाठी लिहिली गेली, हे अवी बोलला.
अवघी पाच पानी कथा. मग विचार सुरू झाला, गोष्ट सांगणे ही देखील एक कला आहे.

मी शाळेत सातवी वगैरेंत असेन, वर्गात ऑफ पिरीयड मिळवा ही सर्वांचीच इच्छा.
असा तास मिळाला, तर कधी एखादा शिक्षक ‘आमचा’ असा आला, की आम्ही त्यांना गोष्ट सांगायचा आग्रह करायचो.
एकदा बाई म्हणाल्या, गोष्ट ठीक आहे, पण ती तुमच्यातीलच कुणीतरी सांगायला हवी. कोण सांगणार?
सगळा वर्ग माझ्याकडे पाहू लागला. मी उठलो आणि वर्गासमोर उभा राहिलो.
कोणती गोष्ट, मी काय सांगणार मलाच माहीत नव्हते. सुरुवात केली, मजेदार केली आणि अर्ध्या तासात संपवली.
मग हा पायंडाच पडला. ऑफ पिरीयड अचानक कधीही येई. गोष्ट सांगायची फर्माईश, मी उठून उभा, गोष्ट सांगे, ती मुलांना आवडेही.
ही गोष्ट तशी सोपी असे. व्यक्तिचित्रणे तयार होती, मुले एंटीसीपेट करीत.
‘टॉस ए सिच्युएशन’ टाईपची कथा असे, जी सिटकॉम करताना आपण वापरतो.
आधी तयारी वगैरे कधी केलीच नाही. प्रचंड वाचन आणि तरल कल्पनाशक्ति बस.

मग पुढे कधीतरी नाटकांसाठी लेखक वगैरे बनावे लागले. क्राफ्ट जमा करत गेलो.
जसजसा पुढे गेलो तसे, व्यक्तिचित्रण, प्रिमाईस, टोन, स्ट्रक्चर, लॉजिक, बॅलन्स,
रिलेवांस, से, ड्रामेटिक इश्यू, ड्रामेटिक स्टेटमेंट- वजनं वाढत गेली.
यातून लिहिणे अवघड होत गेले. लिहिले तेव्हा स्तुति, कौतुक होई, बक्षिसे मिळत, पण प्रयोग तिथेच संपे.
लिहिणे जड झाले होते, इतके मात्र निश्चित. कारण लोक मागत- माझे होत नसे.

त्या ‘गोष्टी सांगणार्‍या माणसा’चं काय झालं?
असा मलाच प्रश्न पडला आणि 'गोष्टी सांगणारा माणूस' ही मालिका जन्माला आली.
तिच्या पन्नास कथा लिहून या प्रयोगाविषयी लिहावे, असे मला वाटत होते,
पण मुद्दलात माझ्या गोष्टी सांगण्याच्या क्षमतेविषयीच एक शंका मनात आली होती.
आज तीस कथा सहज लिहून झाल्यावर ती मिटली, तेव्हा आता थांबायला हरकत नाही.

आता या प्रयोगाविषयी:

1) ‘गोष्टी सांगणारा माणूस’ ही मालिका लिहायला घेताना स्वत:साठी जास्तीतजास्त कठीण कशी करता येईल, हे पहिले.
कथा पूर्ण नसेल. सरळसोट नॅरेशन नसेल. समजायला अवघड नसेल पण विचार करायला उद्युक्त करेल.
विचार केला तर सबटेक्स्ट दिसेल, अन्यथा फक्त कथा वाचा, एंजॉय अशी पद्धत निवडली.

2) गोष्टी सांगणारा माणूस ०१ असे टाइप करेपर्यंत मला माहीत नसेल की मी कोणती गोष्ट सांगणार आहे.
पूर्वतयारी अजिबात नसेल, त्यामुळे रचनेचा प्रश्नच नाही. गोष्ट एकटाकी लिहिली जाईल आणि फ्लो मध्ये स्ट्रक्चर होईल.

3) रचना नसेल, त्याचप्रमाणे कॅरेक्टर्स रेखाटन नसेल. प्रत्येक कथा नव्या व्यक्तिरेखांसह, ज्यांचे चित्रणही होणार नाही.
म्हणजे, कॅरेक्टर्सच्याआड कथानकातील उणीवा झाकायचे स्वातंत्र्य मिळणार नाही.

4) कथेतील रचना, कॅरेक्टर्स रेखाटन आणि तपशील जाणीवपूर्वक टाळल्यावर फक्त गोष्ट उरेल.
त्या गोष्टीवर असलेला रॉनेस हाच तिचा यूएसपी राहील.

5) ही कथा प्रमोट होऊ नये, म्हणून ती अवेळी पोस्ट केली जाईल. बर्‍याच कथा रात्री बारा किंवा एकलाही पोस्ट झाल्यात.

6) यानंतर ज्या प्रतिक्रिया येतील त्या प्रेमाने आल्यात असे समजून त्यावर फार विचार करू नये.
गोष्टी सांगणे हा मूळ उद्देश, त्याला हरताळ फासू नये.

7) गोष्टी सांगणे, या प्रक्रियेचा मूळ हेतू, लेखकाची विचार क्षमता जागी ठेवणे आणि सातत्याने नवता देण्याची शक्यता राहणे ही असेल.

8) मूळ हेतू सिद्ध झाल्यास गोष्टी सांगणे या क्रियेला प्रयोजन राहणार नाही.
जरी ती बंद करणे हा आग्रह नसेल. अशा गोष्टी तहहयात सांगता येतील.
मात्र त्यात पुंनरावृत्ती अटळ असेल. त्यामुळे थांबणे हा सेल्फ डिसीप्लीन राहील.

9) रचनेतील अन्य तांत्रिक बाबी आपण नेहमीचं करत आलोत. त्याचा कंटाळाही येऊ शकतो. तेव्हा असे प्रयोग उपकारक ठरतात.

10) असो. नव्या वर्षात प्रवेशताना, शून्यातून सुरुवात करणे अनेकदा परिस्थिति आपल्यावर लादते.
आपण शून्यातून शून्याकडे जातोय याची आपल्याला कल्पना असल्याने तो काही मोठा इश्यू होत नाही.
ज्यांनी या कथा वाचताना, वाचून संपर्क साधला, चर्चा केली, आवडले, कळाले नाही, नावडले,
असे स्पष्ट संगितले त्या सर्वांचे आभार, कारण या प्रयोगात तुमचा फीडबॅक हाच महत्वाचा मुद्दा होता.

धन्यवाद!
-Aabhas Anand

३०. गोष्टी सांगणारा माणूस ... बळिराजाचे राज्य.


आज ही सांगणं भाग आहे. उद्या या प्रयोगाविषयी...before winding up.
माणूस हा एक जनावर आहे. जनावराच्या सर्व प्रेरणा त्याच्यातही आहेत.
आहार,निद्रा,भय, मैथुन या मुख्य प्रेरणा ‘स्व’ शी निगडीत आहेत.
त्यामुळेच जेव्हा तो स्वत:पुरता विचार करतो तेव्हा तो या पैकी एका भावनेचे चलन असतो.
यांचे शमन करतानाही तो 'स्व' निष्ठ असतो. मात्र या प्रेरणा सहजसिद्ध होण्यासाठी आवश्यक सुरक्षा तो कळपात राहून मिळवतो.
प्राणी हे समूहजीवन जगतात. त्यांत एक प्रकारची सुरक्षा आहे.
ही सुरक्षा मिळवताना त्यातील प्रत्येकाला काही किंमत चुकवावीच लागते.
उदा. कमजोराला बाहेरून होणाऱ्या हल्ल्यात आधी बळी जावे लागते.
तसेच बलवान म्होरक्याला बाहेरून होणारा हल्ला, स्वत: जीवाची बाजी लावून परतवावा लागतो.
समूहातील मादी, सर्वोत्तम आणि सबल नराला प्राप्त होते आणि तिला मात्र कधीही दुसर्याच सबल नराच्या कह्यात जावे लागते.
समुहाचे नियम असतात. ते निमुटपणे पाळणारा या समुहाचा सभासद राहू शकतो.

हे नमनालाच घडाभर तेल यासाठी की जेव्हा आपण माणूस नावाच्या, समुहातच राहणाऱ्या जनावराकडे पाहतो,
तेव्हा हे नियम पार उलटे-पालटे झालेले पाहतो. याला कारण त्याची बुद्धी आहे हे निश्चित.
या बुद्धीने त्याने समाज बांधला, त्याचे नीती-नियम बनवले आणि ते पाळावेत म्हणून बंधने, कायदे-कानून तयार केले.
हे करताना उद्देश हा होता की समूहाचे संकेत सर्वांना मान्यच असावेत- जर कधी एखादा ते तोडेल, तेव्हा कायद्याचा वापर व्हावा.
अशा आदर्श स्थितीत आपण सुरुवात केली असेल- ती आज कुठवर पोहोचली आहे?
तर माझा मित्र बळी पिळया म्हणजे, बळीराज पिळणकर, (याला पण यापुढे सोयीसाठी बळी-पिळयाच म्हणू.)
हा राजवंशात जन्माला आल्याने बळीराजाचे राज्य त्याच्यापुरते आलेले आहे.
बळी-पिळयाचा बाप झेडपीच्या अनेक कमिटयांवर चेयरमन आहे.
चार-दोन हॉटेल्स आहेत वर गॅस एजन्सी. त्यामुळे व्होल जिल्ह्यात त्याची चालते.
असा बळी मला मानतो हे एक आश्चर्यच. म्हणतो-
"यार, कधी काय ट्रबल आला की, तुला फोन लावतो. तेरे पास हर मर्ज की दावा होती हय दोस्त."
कपाळ! याला काय सांगणार वैद्याची गुटी, त्याला स्वत:च्या कामी येत नाही.
पण तो आपल्याला मानतो ही साची बात. म्हणजे आपल्यात पण कायतरी सॉलिड दुर्गुण असणारच!
अशी मी आपली समजूत काढून घेतो.

 "यार तू बाकी एकदम ओके आहेस, सिर्फ एक लफडा आहे तुझ्यात."
"काय तो बळी?"
"तुझा भरोसा देता येत नाय कधी. ठीक असलास, तर किंग जॉर्ज आणि बिनसला तर चंगीजखान ! काय गॅरेण्टी नाय तुझी."
"ती दुनियेत कसलीच मिळत नाय रे. चायनीज मालाचीसुद्धा!"
"बाईची गॅरेण्टी देता येते काय?" बळी थोडा टेन्स दिसला.
"काय येडा आहेस काय? एकवेळ चायनीज मालाची गॅरेन्टी देता येईल!"
"मग काय करायचं, ते सांग!"
"मला आधी वार्ता काय ती अगडम-बगड्म सोडून सांग."
बळीपिळ्याच्या हॉटेलात ही वार्ता सुरू होती, म्हणून त्याने दोन चिकन टीक्के स्टार्टर म्हणून मागवले, आणि पोराला स्टफ सांगितला.
"आज इथूनच जेवून जायचं, मी सांगतो वयनीला."
"नाही, ठीक आहे. तिला कल्पना दिलीय मी." आता वयनी कशाला मध्ये?
मग बळीपिळ्याने त्याची इस्टोरी टाइटल सकट सांगितली.

बळीपिळ्याच्या बापाच्या कुठल्यातरी झेडपी कमिटीतल्या एका सभासदाच्या पोराचं शिकायला गेला तिथे एका पोरीशी जमलं होतं.
पोरगी जरा ‘सभ्भे’ घराण्यातली होती. म्हणजे नावावरून तसं वाटत होतं.
आता या मेंबरचा पोरगा खानदानी असला, तरी सुसंक्रूत कसा दिसायचा?
म्हणून बळीच्या बापाने बळीला जरा ताम-झाममध्ये पोरा सोबत जायला सांगितलं.
बळीने पोरं जमा केली. एक स्कॉर्पिओ बळीची सवारी आणि पाच बुलेटी.
स्कोर्पिओ यायच्या आधी सायलेंसार काढलेल्या बुलेटी यायच्या.
रस्त्यावरचाच काय, दुकाना-हॉटेलातला माणूस पण चमकून बघायचा. कौन जा रहा हय?
अशे पहाटेचे निघाले. बुगुर्र बुग बुग बुग बुग... फाड फाड फाड फाड फटाक फाड फाड... गेले.

पोरीच्या घराजवळ पोचले तेव्हा वाजले होते सकाळचे अकरा.
अचानक तो शांत एरिया फडाडून उठला. लोक बाल्कनी, विंडो मिळेल तिथून पाहू लागले.
पोरीची माय आणि बाप बाल्कनीतून. च्यायला असा जावई पाहिजे! काय आलाय-काय आलाय!
बळीपिळयाचे अग्रदूत बुलेटी स्टँडला लावून धावले. त्यांनी बळीपिळ्याला दरवाजा उघडून कुर्निसात केला.
बळीचा रूबाब असा की जसा खासदारच उतरला. वधुमाय म्हणते, जावईबापू छानच!
मागे ते मरतुकडं डॉक्टर होऊ घातलेलं, बाहेर आलं त्याची कुणालाच पडली नव्हती. सारा शो बळीपिळ्याचा.
पोरीच्या घरात सगळे सेट झाले. पोरीने कायद्याने कांदेपोहे आणले. बळीपिळ्या हलला!
त्याला बच्चन द्यायची होती. घे SSS सुटला तो! साला पोराची मार्केट करायची तर कोण करूच देना त्याला.
सगळे त्याचीच खबर काढतायत. हा ही सुटला.
तुला चाळीस खाटांचं हॉस्पिटल बनवून देतो! बोलला.
लोक खुश दिसत होते- पण मध्येच नवरा मुलगा दाखवला. बोंबला! चेहरेच उतरले ना तिथले.
कुस्ती मारल्याच्या नादात बुलेटी सुटल्या, ते थेट झेडपी ऑफिस. बाप आणि त्याचे चमचे इंतेझार करत होते.
त्यांना दिल्ली काबिज केल्याची खबर दिली आणि सुटले.

पुढे दोन हफ्ते काहीच प्रोग्रेस नाही. पोराचा बाप घायकुतीला. अरे काय कळवलं नाही त्यांनी?
आम्ही काय अड्डम सड्डम आहोत का? एकदम प्रेस्टिजचा सवाल झाला. दोन हफ्त्यांनी पोरीचा फोन.
कुणाला? बळीपिळ्याला! आता बोला!
म्हणते, “ह्याचं माझं जमणार नाही, हे समजलंय मला.”
बळीपिळ्या त्या पोरीला समजावतोय,
“अरे असं करू नको हो! आम्ही काय कमी ठेवणार नाय. सगळं व्यवस्थित करू.” वगैरे.
पण पोरगी ऐकायला मागे ना. पण एक दिवसाआड तिचा फोन बळीपिळ्याला.
तिला समजावताना नाकी नऊ नाही, दहा,वीस बत्तीस आले बळीच्या. त्या पोरीने चक्क नकार दिला हो! कारण???
 ... अता नाय पता! पोराला, बापाला समोर घेतला, काय ते बोल. पोर अळीमिळी. हात तुझ्या!

एक वर्षाने बळीपिळ्याचा बाप पोराची पत्रिका गावभर वाटत होता. सांगत होता सुनबाई डॉक्टर आहे.
लग्नाची आणि चाळीस खाटांच्या हॉस्पिटलची तयारी एकसाथ सुरू. बळीपिळ्या फॉर्मात, कारण टोळीचा नियम.
सरदार एकच असतो. शादी झाली आणि हॉस्पिटल खुललं. ते पोरगं आता त्याच हॉस्पिटलला नोकरीला आहे.
सवाल ये हय की फंडामेंटल कुठे गेलं?

लक्षात घ्या, आपल्या सगळ्या अकलेसकट फंडामेंटल तेच आहे!

Thursday, December 24, 2015

२९. गोष्टी सांगणारा माणूस... आमचे सट्ट्याचे प्रयोग...


आमचे सट्ट्याचे प्रयोग...

सत्यावर सट्टा लावावा अशी परिस्थिति या भारतवर्षात अनेकदा उभी राहते.
सत्याचे दोन तट पडतात. प्रत्येक म्हणतो माझे तेच सत्य, तुझे ते असत्य.
एकाच वेळी सत्याची दोनच नव्हे तर अनेक वर्जन्स घेऊन उभा राहिलेला समाज म्हणजे आम्ही.
ही परिस्थिति बदलायचा जो प्रयोग मी जेव्हा-जेव्हा केला, तेव्हा-तेव्हा माझ्या सत्याचे वरील शीर्षकात रूपांतर झाले.

८० चे दशक असेल. आमच्या एरियात कोणातरी ‘आर’ ला. रीटयर्ड हर्ट नाही, व्यवस्थित जगण्याची हेलपाटी टाकून, ‘राम बोलो.’
आमच्या एरियात आम्ही नामचीन खांदेकरी. पालखीचे भोई असतात तसे आम्ही तिरडीचे ढोई.
आम्हाला हमखास आमंत्रण, फिक्स. ज्या घरात कधी बारशाला, पूजेला, एंगेजमेंट इतकंच काय, लग्नालाही बोलावत नाहीत,
त्यांचे हे एक आमंत्रण फिक्स आम्हाला. बरं ही आमंत्रण कधी काळ-वेळेला?
अर्थात काळ-वेळ बघून जाण्याची पद्धत नाही ना.
रात्री-बेरात्री, दसरा नाही, दिवाळी नाही- कॉल आला की ढोई निघाले.
इतके ट्रेन्ड लोक झालेत, की मयताच्या सामानाच्या दुकानातही समान चेक करून, वाजवून घेतात.
मागचे हिशेब काढून आज भाव घासघीस करतात. त्या दुकानवाल्यांनी पण आता हात टेकलेत.
असो, मुद्दा तो नाही. आज तिरडीवर काढतोय, ते आहे सत्य.

आता तुम्ही विचारलं, शाश्वत सत्य की अशाश्वत वगैरे , तर त्याला काही अर्थ नाही.
सत्य नेहमी कालसापेक्षच असतं.
तर ८० च्या दशकात आमच्या स्मशानात नुकतेच इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम सुरू झाले होते.
भाव मुदडी-दीडशे रुपये फक्त. तर सवा खंडीचा विषय निघाला, तसे मी पर्याय सुचवला.
फक्त दीडशे रुपये. घ्या सावलतीत आहे. च्यायला जुर्म हो गया.
“लाकडावर दहन ही आमची संस्कृती आहे. ती आम्ही जपणार. इलेक्ट्रिक वगैरे अमेरिकन नखरे आहेत. ते इथे नकोत.”
“अरे, पण एक मुडदा जाळायला लाकडे किती लागतात? म्हणजे झाडांचा- पर्यायाने पर्यावरणाचा नाशच ना?”
“हे तुमचे बुद्धिवादी तत्व तुमच्याकडेच ठेवा. नाहीतर त्यांना जाऊन सांगा, जे जमिनी खराब करतात.
आमची संस्कृती बघा. सारं काही राख होऊन जातं. म्हणजे खराब काहीच नाही.”
“अरे, पण जंगल, झाडे यांचा नाश होतो की. पर्याय नव्हता तिथे आणि तेव्हा ठीकाय.
पण आता सरकारने स्वस्त पर्याय उभा केलाय, तर वापरायला काय हरकत आहे?”
यावर मोठा वाद होऊन मी अधर्मी, धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि अतिशहाणा ठरलो.
ते दहन रीतसर सवाखण्डीवर झाले. खरे तर सत्य तेव्हा असत्य ठरले म्हणजे, त्या लाकडांवर तेच जळले होते.
पुढे विद्युतदाहिनी नीट वापरात यायला आणखी चार-पाच वर्षे गेली,
आणि दहा वर्षांनी तर , तेव्हा ज्यांनी मला भ्रष्ट, अतिशहाणा ठरवले होते,
त्यांच्या घरातील उत्तरक्रियाही विद्युतदाहिनीवरच झाल्या.
 आता पुरोहितांनी ही पद्धत सशास्त्र धर्मातही आणली आहेच.
थोडक्यात- धर्म म्हणजे कर्मकांडे आणि परंपरा, यांचा एव्हढा झापडी पगडा आपल्यावर आहे,
की त्यात बदल म्हणजे धर्मनाश, असे काही आपल्या डोक्यात रुजते.
यात सत्याचा प्रयोग सट्ट्याचा ठरतो, याचा हा एक अनुभव.
 
असेच एकदा भारत देश आणि त्याच्या महानते विषयी गप्पा सुरू होत्या.
म्हणजे तो भारत नाही, जो १९४७ साली स्वतंत्र झाला, तर तो भारत जो प्रत्येकाच्या कल्पनेत अस्तित्वात आहे.
या चर्चेचे नमुने:

“लंका आणि भारत यांना जोडणारा सेतू आहे. आजही दिसतो. नासाने ही मान्य केलेय, आता बोल!”
“काय बोलू? सेतू होता म्हणून आपल्याच जहाजांना संपूर्ण श्रीलंकेला वळासा घालून मद्रास नाहीतर कलकत्त्याला जावे लागते.”
“जाऊ देत ना! त्यांना लांब पडते म्हणून आम्ही आमची ऐतिहासिक रचना तोडणार नाही.”
“अरे सुवेझ, पनामा असे कालवे झाल्याने समुद्रप्रवास, किती वेळ, श्रम आणि पैसा वाचवतो आहे.”
“तुला शेवटी सेतूवरच घाव घालायचाय ना? हीच अपेक्षा तुझ्याकडून.”
मी तिरडीवर.

“भारत सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडे एव्हरेस्ट आहे, त्यावर पहिल्यांदा जाणारा तेनसिंग नोर्गे आहे.”
“तो तेंझिंग आहे.” करेक्ट?
“म्हणून काय झालं?”
“अरे तेंझिंग नेपाळी होता. आणि हे जे एव्हरेस्ट म्हणतोयस ना, त्याचा अर्धा भाग नेपाळमध्ये आहे आणि अर्धा चीनमध्ये.
आपल्या हद्दीत एक कण नाहीये.”
“काय बोलतोस!” पूर्ण अविश्वास!
“तुला खूप बरं वाटलं असेल ना? ते भारतात नाही म्हणून?”
हा अस्सल प्रतिवाद झाला. घालशील! घालशील परत वाद?
काढ तिरडी!  

“जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक , ताजमहाल, आपल्याकडे आहे, हे तर मानशील?”
“हे मी का मान्य करू नये? कारण देशील?”
“आता बघ! झटक्यात मानतोय! कारण तो मुसलमानांनी बांधलेला ना!”
नशीब याने तेजोमहालाची स्टोरी ऐकली नाहीये.
“साले हे फुरोगामी असेच! आपल्या कशाचं कौतुकच नाही आणि जरा दुसर्‍याचं दिसलं की डोक्यावर घेऊन नाचा!”
“एक मिनिट, मी कंफ्यूज आहे. मला समजावं जरा. आपलं, दुसर्‍याचं म्हणजे नक्की काय?
इतिहास घडताना त्या लोकांना काय स्वप्न पडलेलं का?
की पुढे असा-असा एक महान देश जन्म घेणार आहे- तेव्हा घडायचं तर त्याच्या हद्दीत घडू या, नाहीतर नकोच ते!”
“म्हणजे? काय म्हणायचंय? स्पष्ट बोल?”
“बघ आपल्या पुराणात वर्णन केलेले कित्येक प्रांत, राज्ये आज बांगलादेशात आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानात आहेत.
तर आज त्यांचा अभिमान बाळागायचा की नाही?”
“म्हणाजे पाकिस्तान आणि बांगला देशचा?”
“नाही प्राची आणि तक्षशीला वगैरे?”
“का?”
“नाही तुमची परमिशन नसेल तर आपण १५ ऑगस्ट १९४७ पासून नको मानुया त्याचा अभिमान. गांधारचाही नको.”
“आता ते आपल्या देशात नाहीत ना, संपलं!”
“हो पण ते आता दुसर्‍या देशांत आहेत, तर त्यांचा द्वेष करायला (च) हवा का? ते ही सांगा.”
“हा हरामखोर आहे. शब्द गोल-गोल फिरवून फसवतोय.”
“यांच्यामुळेच तर वाट लागली.”
भारताच्या फाळणीत माझा वाटा आहे, हे मला असे समजले. तिरडी!
“मला सांगा, भारताच्या पश्चिमेला काय आहे?”
“अरबी समुद्र”
“का?”
“का म्हणजे काय? आहे म्हणून आहे!”
“पण अरबी समुद्रच का? भारतीय का नाही? साला रोज तुम्ही चौपाटीवर जाता, ते अरबी समुद्र पाहायला?”
माझ्या आता मस्तीच आली होती.
“समुद्राच्या पाण्याची कसली जात पाहतोस? नावात काय आहे? समुद्र तो समुद्र ना?”
इतका सुंदर लॉजिकल विचार करू शकणार्‍या मित्राचा मला हेवा वाटला.
समुद्र –समुद्र, जमीन-जमीन नाही.

“मला एक डाऊट आहे.”
“आता आणखी काय?”
“समजा, भारताचा एक मुस्लिम सैनिक, लढाई करत पाकिस्तानच्या हद्दीत गेला.
खूप पराक्रम केला त्याने, आणि समजा, युद्धात जखमी होऊन पडला त्यांच्या हद्दीत... तर त्याचे प्राण कुणी वाचवायचे?”
“म्हणजे काय? आपले सैनिक जातील आणि वाचवतील!”
“नाही, समजा जबरदस्त शेलिंग सुरू आहे. कोणी जाऊ शकत नाही. त्याचे प्राण आता फक्त देवच वाचवू शकतो. तर..?”
“तुला काय म्हणायचंय? स्पष्ट बोल!”
“नाही म्हणजे, त्याचे प्राण वाचवायचे कोणी?
भारताचा सैनिक आहे म्हणून देवाने की, मुस्लिम आहे, म्हणून अल्लाने?
आपला देव पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्या सैनिकाचे प्राण वाचवेल?
की अल्ला, त्याच्या बंद्यांशी युद्ध करणार्‍या काफिराला वाचवेल?”
“तू स्वत: कंफ्यूज आहेस, आणि आम्हा क्लीयरहेड लोकांचा बुद्धिभेद करतोयस!”
“याच्या नादाला लागू नका, हा दुंनियेवरून ओवाळून टाकलेला आहे.”
“कोणी का वाचवेना! तुला काय पडलीय?”
“फक्त तिरडी बांध तू !”

-देव एकच आहे हे शेवटपर्यंत कोणी बोललाच नाही.
तिरडी !

२८. गोष्टी सांगणारा माणूस...ललित कथा


"या माणसाला शिस्त कशी ती नाहीच. वर लाज-शरम सारे कोळून प्यालाय!"
"अष्टभुजे, हा माणूस- नात्याने कोणीतरी लागतो, आपला." लाज-शरम कोळून प्यालेला माणूस, वात नीट करतो.
"कुठल्या मुहूर्तावर या माणसाची गाठ पडली, माहीत नाही. देवा, इथे भेटलाय, वर भेटवू नकोस?" ...
"इथे तरी का भेटवले, माहीत नाही!" ला.श.को.प्या. माणूस फुसुक्.
"काय-काय? मोठ्याने बोल ना! हिम्मत असेल तर!"
"जन्म झाला तेव्हा मी मोठ्याने बोलायचो. अगदी आईसमोरसुद्धा."
"मग पुढे काय झालं?"
"पुढे लग्न झालं."
"आवाजाचं काय झालं?"
"ते कळलंच नाही. बरा होता बिचारा!"
"फालतू जोक! फेसबुकवर टाक तो! इथे नाय हसणार कोण!"
देवीने परफेक्ट पकडला.


अष्टभुजेच्या नात्यात कसलंतरी फंक्शन होतं. तेच, सोन्याने लगडलेल्या म्हशी फिरत असतात, तसलं.
हमखास टाळावी अशी इव्हेंट. मी बॉसला ब्लाइंड लावला. ऑफिसात सीधे नऊ वाजवले.
मुश्किल में काम आनेवाला दोस्त, जगू को साथ लिया, टॅक्सी मारके सीधे ललित.
फोन सायलेंटवर ठेवून अपलवले. तिथूनच प्लान करून जगुलाच इमर्जन्सी वॉर्डमध्ये फेकला,
आणि त्याच्याकडेच झोपलो. नेक्स्ट डे सॅटरडे...

अष्टभुजा मूर्ख नव्हती. ती या केसवर रीसर्च करणारच.
म्हणून फुल सेटिंग केली होती. जगुलाच फोन करून इमर्जन्सी वॉर्डची आणि त्याचीच चौकशी,
पुढचे चोवीस तास कसे क्रिटिकल आहेत, वगैरे करत होतो, तर डिंग-डाँग!
एंटर्ड अष्टभुजेची सहेली फॉर्म गिरगाव! शत्रुपक्ष आला तो थेट किचनमध्ये.
गुप्तवार्ता झाल्या. दोन तासांनी शत्रुपक्ष छद्मी नजर टाकत गेला, तेव्हाच लकाकली होती.
अष्टभुजेने काहीवेळ शांतता राखली. ती अंगावर येऊ लागली म्हणून,
"काय म्हणत होती रेखा?" असा टाकला.

 "जिला-तिला रेखा म्हणू नको! तुला वाटत असली तरी! नीता नांव आहे तिचं."
"अरे वा!"
"अरे रे म्हण! तुझे कालचे ललित लेखन वाचले तिने."
"मग? आता काय इथे समीक्षा करायला आली होती?"
"ती मी करते. रेखा म्हणे! रेखा!!"
साला हा बाण वर्मी बसला वाटतं.
"काय करतो तिचा नवरा हल्ली?" मी हवाबाण हरड़े बदलू घातले.
"ललितमध्ये मॅनेजर आहे."

सन्नाटा...... साला बार बदलायला हवा- एव्हढाच विचार करू शकलो.
पुढे कानात अनेक आवाज आणि डोळ्यांसमोर फिरते नेहरू तारांगण.

जाग आली तेव्हा मी वार्ड नंबर तेरा सर्जिकल.
" पुढचे चोवीस तास क्रिटिकल आहेत.", एक बावा बोलत होता.
"डॉक्टर काहीही करा! त्याला वाचवा! माझं मॅक्विन्टोशचं दुकान आहे हो तो!
तो गेला तर माझं कसं होईल? मी कुणाकडे बघू?"

साला जगू! हा मेलोड्रामा त्याचाच!
अष्टभुजेचे डायलॉग्ज दुसरा कोण मारणार?

Sunday, December 20, 2015

२७. गोष्टी सांगणारा माणूस... टोटका

"बोल कांच्या, ग- ग रेss गुत्त्यातला, म-म रे ss मटक्यातला, भ-भ रे ss"
सळया, विटांनी भरलेल्या कन्स्ट्रक्शन साइटवर नव्याने लागलेल्या कांच्याची माल्ट्या, मराठीची शिकवणी घेत होता.
साइटवर रहायचं तर मराठी यायलाच हवं, नाहीतर उद्या सकाळी काठमांडू! असा दम भरलेला.
ते नेपाळी पोर भेदरलेलं... माल्ट्याच्या ढुसला नाही, मराठीला!
पहिल्याच दिवशी ष क्ष ळ वगैरे उच्चारायला लावून कांचा जेरिस आणलेला.
माल्ट्या एका हाती चार इंची प्लायवुडची पट्टी घेऊन प्रत्येक चुकीला त्याच्या पोटरीवर चपाती काढत होता.
पोर बाप जन्मात मराठी शिकणार नव्हतंच! ते मार खात होतं, नंतर पैशा मिळणार म्हणून.
रोज तीन शब्द आणि एक जोडाक्षर बोलला की त्याला रूपया मिळायचा. तो रुपया जपून ठेवायचा.
त्याला पैसे मिळत होते ते रात्री साइटचा पोरांना मुक्त वापर करू देण्यासाठी.
मग तेलाचे झाकणदिवे लावून कुठे फोर-एट फिल्ड लागे. कुठे मैफल. दुनियेला ताप नाय, मेंढीचा खतरा नाय की रेडची डर नाय.
एकेका टायमाला तीन-तीन फिल्ड सेट व्हायची. टेबलच दोन-तीन हजार निघायचं.
त्या दिवशी पौर्णिमा होती, म्हणून आरुमुगमला संचार दिसणार होता.
आरुमुगम साइटवर बिगारी, त्याला शक, त्याच्या बायकोवर, येरिमलईवर कोणी करणी केलीय.
त्यावर उपाय करायचा तर माल्ट्याला केस हिस्टरी माहीत हवी, म्हणून कांच्याला हाताशी घेतलेला.
आम्हाला पता काय, आम्ही कोणती बला खड़ी करतोय!
आरुमुगमला सांगितलेले, करणी काढायची तर पैसे खर्च करावे लागतील.
त्यात एक कोंबडी, बैदा, हळद, गुलाल, धूप अगरबत्ती, कणीक आणि लिंबू लागेल.
कोंबडीचा नंतर येरिमलई प्रशाद बनवेल, दारू आमची. खुशी खुशी तयार झाला आरुमुगम.
त्याची पनौती सस्त्यात कटणार होती. पैसे घेऊन कांच्याला संध्याकाळी मार्केटला पाठवला.
विडी,सिग्रेटी, सोडा-दारू टेबलखर्चीतून, आपल्याला ताप नव्हता.
पोरांनी लाकूड-पाचोळा पहिल्या मजल्याच्या स्लॅबवर आणून ठेवला. जय्यत तयारी होती.
करणी काढायची म्हणजे साधीसुधी बाब नव्हती.

माल्ट्या ही एक वल्ली आहे.
सुपीक डोके, त्यात बडे खानदान का पोता.
वर मुंबई सर्किटला गाजलेले थिएटर केलेला.
संचार म्हणजे त्याच्या सुपीक डोक्याला आणि अभिनयाला पर्वणी.
रात्री नऊला खोलीच्या मध्यात लाकुड- पाचोळा रचला.
उतार्‍याच्या कामात बाईमाणूस चालत नाही- म्हणून येरिमलईला, साइटपाठी त्यांची झोपडी होती
तिथे नारियल-मसाला बनवायला सांगितले.
मुरगी बळी दिली की चवन्नी ती साफ करून तिला देणार होता. कशी साफ करणार होता माहीत नाही.
कारण चवन्नीकडे फक्त पॅरापीटवर लपवलेल्या हत्यारातला एक चॉपर होता.
मुरगीची गेम करणार होता चवन्नी.

अंधार पडला, झाकणबत्त्या लागल्या तशी माल्ट्याने सुरुवात केली.
आधी कपडे उतरवले आणि इनरवर हातात उदबत्त्या धरून तो खाली साइटच्या टाकीवर गेला. मागे आरुमुगम - नंतर सेना.
कुठलेतरी अगम्य मंत्र उच्चारात माल्ट्याने टाकीत मुटका मारला. आर्किमिडीजच्या नियमाप्रमाणे टाकी बाहेरची पब्लिक चिंब!
टाकीत आवाज घुमवत माल्ट्याने तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओल्या अंगाने बाहेर आला.
चवन्नीने त्याच्या डोक्यावर गुलाल उधळला. माल्ट्या लालमलाल. विश्याने गवताची एक चूड करून पेटवली.
ती घेऊन माल्ट्या पुढे आम्ही मागे. मंत्रात मध्ये-मध्ये शिव्या यथेच्छ पेरलेल्या.
त्या करणी करणार्‍याला आहेत- असे आरुमुगमला पटवले.
पहिल्या मजल्यावर येताच माल्ट्याने जमवलेला फाटा, चुडीने पेटवला. लिंबू समोर ठेवले.
बाजूने हळद, कुंकवाचे सर्कल काढत मान हलवत तो तोंडाने बुगू-बुगू आवाज काढत होता.
अंग अजून ओलेच असल्याने पेटलेल्या कुंडासमोर तो हबशाची शिसवी मूर्ति वाटत होता. ब्युटिफुल ब्लॅक.
आता त्याने भूतांना बोलावत, आणलेली कणीक इथे-तिथे उडवायला सुरुवात केली.
माहौल इतना खतरनाक की, कांचाचे डोळेसुद्धा उघडलेले!
मग संचार सुरू झाला. माल्ट्याचे सगळे अंग थरथरू लागले. तोंडाला फेस आला. बुबुळे गारगोट्या झाली.
आरुमुगम दहशत बसून बघत होता. अचानक माल्ट्या किंकाळ्या फोडू लागला.
साइटवर रात्री भुता-खेतांचा संचार असतो- अशी हवा असल्याने कोणी फिरकणार नव्हतेच. भुते एकदम सेफ होती!

किंकाळी फोडून माल्ट्या धाडकन खाली कोसळला. मग हळूहळू उठला तेव्हा नजर आरुमुगमवर रोखलेली.
'तुम्हारा नाम आरुमुगम... बाप सिलवाराज .... बिबी येरिमलई. तुम्हारा बाप मरा, अम्मा बिमार, भाई खेती करता.
बहन शादी करके गयी. इस में सब अच्छे। एक चाचा खराब। उसका बेटा झगड़ा करता। मैं सब को देख लूँगा।
तुम हर रविवार को येरिमलाई के साथ समुंदर जाना, उसकू नारियल पानी पिलाना,
ठंडा खिलाना, सब ठीक हो जाएगा।' भूताने एकदम सही विलाज दिला.

आरुमुगम थक्क! एव्हढी सही हकीकत माल्ट्या नाही- भूतच देऊ शकणार.
सही हकिकत कांच्याला रोज रूपया देत काढवून घेतलेली.
आता माल्ट्या करणी उतरवू लागला. मुर्गीला हळद-कुंकू फासले.
चवन्नीकडून चॉपर घेतला. आता मुरगी कटणार एव्हढ्यात एक भयंकर किंकाळी फुटली.
कांच्या भेदरून आडवा झालेला.
किंकाळीने दचकलेल्या माल्ट्याच्या हातून मुर्गी सुटली. ती फड-फड करत धूंनीभोवती पळू लागली.
तिच्या मागे आम्ही. मुर्गी पळ-पळ पळाली आणि पीलरच्या बाजूने पॅरापीटवर उतरली.
तिथुन स्ट्रक्चरची एक बीम जिला पुढे सळया होत्या, त्यावर गेली. पार सळीच्या टोकावर जाऊन उभी राहिली.
चवन्नीने बीमवर तोल सांभाळत जायचा ट्राय मारला पण त्याचाच आरया व्हायची वेळ होती.
आम्ही शिव्या घालून मागे खेचला त्याला.
मुर्गी वातकुक्कुटासारखी शिगांवर उभी. मागे खोलीत घुमण्याचा आवाज येऊ लागला.
माल्ट्याची काही नवी आयडिया असावी म्हणत आम्ही मागे धावलो तर माल्ट्या पॅंट चढवत होता.
आणि शेकोटी समोर गुढग्यावर बसुन, डोळे फिरवणार्‍या आरुमुगममध्ये संचार झाला होता!

मुर्गी सलियापे, आरुमुगम में संचार, कांच्या बेहोश और हम सब माल्ट्या को गाली देते रहे.

२६. गोष्टी सांगणारा माणूस...एका भग्नाची..भाग -2 अर्थात,

एका भग्नाची..भाग -2 अर्थात,

भग्न तळयाकाठी...

फेड इन-
पुलियापे कावळा, चिमणी आणि बाज़ आमने-सामने, खंदकात सेना, बारूद के साथ-
पलिकडे नामधारी रणगाडे, बांबू होविट्ज़र तोफा... आणि बटकी खंदकात फळीला आय-माय वरून शिव्या देतोय.
समोरचा सीन हलत नाय, हे पाहून वकिलने कॉमेंट्री सुरू केली-

" स्लो मोशन में बाज़ कौऐ को - बाज की ये बात थोडीसी ऑफ़ स्टंपपे के बाहर और बाहर की तरफ.
जाती हुई, कौएने छेड़ने की कोशिश की, भाग्यशाली रहे, थोबड़े का बाहरी किनारा नहीं फूटा,
बाज ने छोड़ दिया- कोई रन नहीं."

इतक्यात छ: फ़ीट बाज़ने आपले विशाल बाहू पसरले आणि कौव्याला मगरमिठीत घेतले.
"और ये अफ़जल ने सिवा को बीच पुलिया दबोच लिया! सिवाकी पसलिया तोड़नेकी कोशिश,
सीवा परिंदे की तरह फड़फड़ाता हुआ, और ये आउट!"
प्लग काढ़ायला लागला वकीलचा!
"कौवा, वाघनख काढ! कौवा वाघनख काढ!!" मॅक ओरडत होता. सिवा कुठे ऐकतोय. तो फडफडतोय!
तोवर "फायर!!" असे ओरडून काबाने ढेकळे फेकायला सुरुवात केली!
ती पुलावर आसपास पडून बंबार्डींग झाल्याचा फील आला.
होविट्झर तोफा आता लुंगी आणि बांबू सावरत पुलाकडे धावू लागल्या.
"भाग कौवा भाग!!" आमचे कौव्याला इशारे- पण हे काय!?
बाज़ आणि कौवा आम्हाला हात करून बोलवताहेत.
साले हसतायत! मग सेना काय फुकट बोलावलीय?
आम्ही मजबूत ढेकळे फेकून पुलावर कोहरा मचवून दिला.
नामधारीचे पैलवान आधी पोहोचले, पण कौवा सेफ होता. आम्ही खंदक सोडले आणि पुलावर पोहोचलो.

"अरे, ऐसे राड़ा नहीं कराते, दोस्तों। अब जो हुवा सो हुवा, मगर मानता हूँ आप लोगों को!"
बाज़ जावयावर खुश होता की आम्ही दिलेल्या फाइटवर , माहीत नाही, पण त्याने काबाला मिठी मारली.
नशीब काबा पाठमोरा नव्हता!
तोच पलिकडून टेंशन ढोलक घेऊन आला. त्याने पुलियावरच वाजवायला सुरुवात केली.
कौवा-चिमणी मध्ये आणि आम्ही बाजूने फेर धरला.
नामधारीचे पैलवान ऑफ बीट टाळ्या वाजवत होते, म्हणून मॅक ने त्यांना नाचायला खेचले.
आता ती धुडं ऑफबीट नाचू लागली.
"आवरी मोटी SSS" पासून काय वाटेल ते गायलो! वरात घरी नेली.
कर्नलीण बाय साफ दारं-खिडक्या बंद करून कानाला हिमालय लावून झोपलेल्या!
आज त्या बाज़ला घरात झोपायला घेणार नाहीत- हे फिक्स झाले.

चिमणीला भेटायला बाज़ला बंदी.
सकाळी गच्चीत कपडे वाळत घालायला चिमणी आणि बाय समोरासमोर आल्या की चेहरे वाकडे करायची कॉम्पिटिशन!
त्यात अर्थात चिमणी जिंकायची.
तिने पृथ्वीला अॅक्टिंग कोर्स केला होता, म्हणजे बोला!
बाज़ नाक्यावर आमच्याकडून चिमणीची खबर काढायचा.
चिमणीला काय पडलेली नव्हती.
असा महिना गेला.
मग चिमणी आणि बाय एकमेकींना चोरून भेटतात अशी खबर नाक्यावर आली.
बाज़नेच आणली.
खबर खरी होती- कारण कौवा अचानक पुलियावर यायचाच बंद!
कुठे दिसला की गल्ली बादलायचा. ही बेईमानी!!
एकदा मॅकने सोमावाण्याकडे रंगेहात पकडला त्याला.
एक हात में थैली दुसरे में यादी! बाराच्या भावात पोहोचला होता कौवा.
तीन महीने गेले, मी घसा धरला म्हणून काणे डॉक्टरकडे गेलो, तर बाहेर ही SS रांग.
रांगेत कौवा. चेहरा मायूस, दुनियेची उदासी घेऊन.
“साला कौवा, तुला काय कावळा शिवला, की तीन महीने नाक्यावर पत्ता नाय तुझा?”
कौव्याने मला बाजूला घेतला-
“यार नाग्या, तुला म्हणून सांगतो- कुठे बोलू नको..” ही कौव्याची नेहमीची स्टाइल.
कुठे बोलू नको, करत दुनियेला सांगेल.
“अरे कौव्याचा चिमणा करायचा फुल प्लान तयार आहे.
माझ्या ज्या-ज्या सवयी बाय ना पटत नायत त्या-त्या बंद!
नाका बंद, विल्स बंद, लाईफबॉय बंद, मच्छी बंद, बियर बंद, फटी जीन पहनना बंद,
दाढी साफ पायजे. भांचो लिपस्टिक लावायची बाकी ठेवलीय मला!
साला मी कोणाला पटवलीय, चिमणीला की बायला, टोटल नाय रे मला!”
कौवा भडाभडा बोलत होता. तीन महिन्याची भडास निकालत होता.
“तू बाज़ला बोल ना! तो तर आपली पार्टी आहे ना?” मी
“अरे बोललो त्याला. तो म्हणतो काही उपयोग नाहीत, माझ्यावर पण सेम ट्रीटमेंट केली होती बाय ने!”
मी खल्लास!
हल्ली कौवा सफेद तलावाच्या भिंतीवर सफेद लिबासमध्ये देवदास सारखा बसून असतो.

ते तळेही आता भग्न झाले आहे.