Monday, October 29, 2012

पवार मास्तर- ३

          
         खेळाडू असलो आणि म्हणून सरांना जवळचे असलो, तरी  शिस्तीचे खाते सरांकडेच होते.  त्यातून आमच्या सारख्या बेशिस्तांची सुटका नव्हती. त्यामुळे मार खाणे अधून-मधून होतच असे. शाळा घरा जवळच म्हणून जरा रेंगळलो , उशीर झाला की सर  गेटवर... हातात 3 पट्ट्या. शाळे समोरचा रस्ता 100 एक मीटर अगदी सरळसोट. म्हणजे शिकारी आणि शिकार एकमेकांना मिनिट- दोन मिनिटे तरी न्याहाळत असत. पोर कल्पनेनेच खलास. आणि सर ?... हा मुलगा-मुलगी कोण आहे.. एकंदर शिस्तीला कसा/शी  आहे? अभ्यासात-खेळात कसा/शी  आहे ? याची गणिते जुळवून असत. उशीर झाल्याचा मार सगळ्यांना पडताना दिसायचा. बाहेरून सार्‍यांना एकच न्याय दिसायचा. फक्त मार खाणार्‍याला कळायचे- सरांनी आपल्याला मारलेच नाही.  नुसते मार दिल्याचा आव आणला आणि पट्टीचा मोठा आवाज केला. आणि बेशिस्त मुलाचा मात्र हात लाल- निळा व्हायचा.  हे सरांचे आणि आमचे गुपित होते. बाहेर अगदी मुख्याध्यापकांना ही याचा पत्ता नसेल.

         अभ्यासात सरांमुळे आम्ही कधी नाही ते थोडे हुशार वगैरे  वाटू लागलो होतो. आता वेळ होती, खेळाच्या मैदानावर सरांना हवे ते निकाल मिळवून देण्याची. त्यावेळी जोगेश्वरी ते दहिसर आंतरशालेय खेळांची चॅम्पियनशिप भरायची... आम्हाला ती ढाल मिळवायची होती. सर आमच्यावर कामाला लागले. दिवसभर अंधार पडेस्तोवर मैदानात.  मोठी मुले खो-खो, कबड्डी, हाय- लॉन्ग जंप, रनिंग, जॅव्हलीन थ्रो, डिस्कस थ्रो यांचा सराव करत, मुलींचाही सराव चाले. ग्राऊंड झाडणे, रेषा आखणे, मातीवर पाणी मारून ती बसवणे, ही कामे पोरे सकाळी मोठ्या उत्साहात करायची. दोन अडीचशे मुले-मुली  एकावेळी मैदानावर असतील. पण कुठे बेशिस्त नाही, वाद-भांडण नाही. छेडाछेड नाही.   सगळ्यांचे लक्ष एकच, परफॉर्मन्स उंचावणे.  सर खरोखर खेळांतले बेताज बादशहा होते.  त्यांच्या एक-एक ट्रिक्स आणि टिप्स आम्हाला  लगेच सरावात प्रयोग करायला लावत. जमले नाही तर करून दाखवत. पुढे थोडे वय झाल्यावर त्यांनी आमच्यातील माजी विद्यार्थ्यांवर हे काम सोपवले. पण तरीही स्वत: मैदानावर कधी ही, त्यांना बसलेले कुणी पाहिले नाही. सतत या पिच वरुन  त्या पिचवर फेर्‍या. दुर्दैव या देशाला खेळांची परंपरा नाही ! सतत दोन महीने आमचा सराव सुरू होता.  आम्ही आपापसात सराव सामने खेळत असू. सरांच्या मेहनतीचे फळ दिसू लागले होते. संघांचा दर्जा उंचावला होता. 

         बोरिवली पश्चिमेला सेंट फ्रान्सिस शाळेच्या मोठ्या मैदानावर या स्पर्धा होत्या. आम्ही गेलो की 'चोगले' ची मुलं किंवा पवार सरांची मुलं म्हणूनच सारे ओळखायचे. दबदबा होता आमचा एक... आमचा आणि दहिसर विद्यामंदिरचा सामना टफ व्हायचा. स्पर्धा सुरू झाल्या. आम्ही आणि छोट्या मुलींनी लंगडी स्पर्धा जिंकली. मोठ्या मुलांनी आणि मुलींनी खो-खो स्पर्धा जिंकल्या. कबड्डीत आम्हाला फायनलला सेन्ट फ्रान्सिसच्या संघाने हरवले. नेल्सन , पोल्सन , रॉबर्ट वगैरे धिप्पाड पोरे समोर, तरी आम्ही त्यांना टफ दिली. आमचा बेस्ट प्लेयर सतीश रेवाळेची पकड करणे त्यांना जमत नव्हते. शेवटी रॉबर्ट  साखळी सोडून जमिनी सरशी बसून गर्दीत लपला. सतीशला दिसला नाही. मागून येऊन त्याने पकड केली. सतीशची पकड झाली आणि आम्ही हरलो. गोविंद देसाई आमचा बेस्ट खो-खो पटू आणि मुलींत वीणा सावंत, महाराष्ट्र राज्यासाठी निवडले  गेले. हाच गोविंद बेस्ट स्प्रिंटर होता. ते ही मेडल त्याने आणले. उंच उडीत आमचा एक्का प्रकाश (पक्या) सावंत. हा अगदी सरळ धावत स्ट्रेट बॉडी हाय जंप मारणारा मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा खेळाडू.  तो पक्षासारखा हवेत उडायचा. 5'.4" हा त्याने स्पर्धेत तेव्हा केलेला रेकॉर्ड. आणि आम्ही जनरल शिल्ड जिंकली. बहुतेक स्पर्धात आम्ही विजेते किंवा उपविजेते होतो. सरांनी एक टारगेट समोर ठेवले आणि मेहनतीने ते साध्य केले होते. आमचे संघ  जेव्हा  समोरच्यांची  हालत करून टाकायचे, तेव्हा सर कधीच पुढे -पुढे करताना दिसले नाहीत. ते कायम मागे, गर्दीत कुठेतरी, कुणाला दिसणारही नाही अशा ठिकाणी उभे असायचे. जी काय मेहनत करायची ती मी दोन महीने केलेली आहे, पुढे सगळं  क्रेडिट मुलांचं ! सर- तुम्ही सर नाही.. मास्रच होता. 

       सरांची आणखी एक खासियत म्हणजे लेझिम. हा लेझिम तेव्हा फक्त एक आमच्या शाळेत व्हायचा. मोठ्या स्पर्धांत वगैरे  त्याची फार तारीफ व्हायची. त्या ज्या काही स्टेप्स आणि ताल होता, तो उत्कृष्ट होता. भर दुपारी उन्हात सर मुलांसोबत  स्वत: लेझिम खेळायचे. हा लेझिम आणि ताल आम्ही आयुष्यभर विसरणे  अशक्य आहे. पुढे अनेक शाळांनी आमच्याच विद्यार्थ्यांकडून तो  बसवून घेतला. आजही काही शाळांत चालतो. आम्ही त्याला घाटी लेझिम म्हणायचो.. आणि इतरत्र जो लेझिम खेळला जातो, तो याच्या जवळपासही येत नाही. अगदी राष्ट्रीय स्पर्धांत दिल्लीला महाराष्ट्र संघाने केलेला लेझिमही याच्या जवळपास जात नाही. तेव्हा  व्हिडिओ असता तर आज याची खात्री पटवून देता आली असती. 

            सरांचा बुलंद आवाज कितीही वर्षे झाली तरी जसाच्या तसा कानात गुंजतो आहे. सर आता समोर उभे आहेत, आपण मैदानावर आहोत, मास पीटी ची तालिम सुरू आहे. सर एखाद्या मुलीला, 
"अगं म्हशी, अंग हलव- अंग हलव !" असा दम देताहेत.  
पीटीचा सातवा (खतरनाक) प्रकार सुरू आहे, त्यात वारंवार ओणवे व्हावे लागते म्हणून राम्या शेट्टी टंगळ-मंगळ करतो आहे. वाकला तर पुन्हा उठतच नाही, तसाच वाकून राहतो. नाहीतर कधी-कधी जमिनीला हात न लावता गुडघ्याला लावून उभा राहतो आहे. सरांचे लक्ष आहे
"आठ -सात-छे-पाच ...  चार- तीन- फिर से !"
सर सातवा प्रकार पुन:पुन्हा करायला लावताहेत. आणि आता-
"शेट्टी- नीट - खाली-वाक- पाच-छे -सात-आठ."  सुरू आहे... 
"आठ-सात- हं-हं-" आणि पुढे शेट्टीच्या पाठीवर वाजणार्‍या धपाट्यांच्या तालावर  सातवा प्रकार सुरू आहे. किंवा... 
"मी बघतोय हं ! राम्या मी बघतोय हं!" की राम्या शेट्टी सूतासारखा सरळ- 
कधीतरी-
"पुन्हा दिसलास तर पडे पर्यन्त मारीन आणि पडल्यावर ही मारीन !"
विसरणे शक्य नाही...   

         खेळात लाडके  झालो तरी सरांचे आमच्या अभ्यासाकडे लक्ष असे. आमच्या सार्‍या बाईंकडे ते वेळोवेळी आमचा अभ्यास कसा आहे याची चौकशी करत. कमी मार्क्स असतील त्याला मी संघातून काढून टाकेन ही धमकी. हा धोका कोण घेतो ? संघात नसणे ही  नापास होण्यापेक्षा भयंकर शिक्षा होती आमच्यासाठी. मग झक मारून अभ्यास करून, बाईंची कंप्लेन्ट सरांकडे जाणार नाही याची दक्षता आम्ही घ्यायचो. शिस्त, अभ्यास आणि खेळामुळे शरीर... सारे कणखर केले सरांनी. आम्हाला पोहता यायला पाहिजे हा त्यांचा  आग्रह होता. मग मोठ्या मुलांसह आम्ही शनिवारी शाळा सुटली की नॅशनल पार्कात काकडपट्टीला ! दोन तास डुबक्या मारून कपडे दगडावर वाळवून, घरी फेक मारत आम्ही पोहायला शिकलो. नुसते शिकलो नाही तर पाण्यातले मासे झालो. सगळे स्ट्रोक्स, सूर , अंडर वॉटर, प्रवाह कापणे.. सगळी तालिम झाली.  बटरफ्लाय पासून बॅकस्ट्रोक पर्यन्त सार्‍यांचे मास्टर झालो. या सार्‍या बरोबरच आमच्या वर्गाचा क्रिकेटचा संघ तयार झाला. आमच्याशी मॅच घ्यायलाच कोणी तयार नसे. घाबरायचे,  इतकी सॉलिड टीम. आंड्या (अनिल) महाजन काय बोलिंग टाकायचा माहीत नाही, पण 'आंड्या उडवतो दांडया...' हे गाणे तेव्हा पोरं सूरात म्हणायची. मी- संजू वैद्य एकदा बॅट धरली की आऊटच व्हायचो नाही. समोरच्या संघाने   कित्येकदा आमचा 100 ला नो लॉस स्कोअर असताना सामना सोडून दिलाय ! या क्रिकेटसाठी आम्हाला कन्सेशन देऊन खो-खो, कबड्डीच्या नावाखाली  बाहेर सोडायचे, सर. ( अभ्यास जोवर ठीक आहे तोवर काहीही करा !) 

         मोठे झालो तसे आम्ही खो-खो आणि कबड्डीच्या संघात आलो. सरांचे ते ट्रेनिंग  जबरदस्त होते. हात कैची- पाय कैची, मुंडी दाब , सूर पकड , साखळी ने वजन टाकणे .. ( सर स्वत: लाल मातीची कुस्ती खेळलेले. त्यातले डाव पकड करायला  वापरुन दाखवत. )  आपला सीआयडी फेम 'फ्रेड्रिक्स' दिनेश फडणीस याचा बादशहा होता. सर्व्हिस टाकताना पाय पकड कशी चुकवायची, रिंगणावरून जंप करून कसे निसटायचे हे आज लिहितानाही  शहारे येतात.  खो-खो साठी आम्हाला इतके चपळ केले, डॉजिंग , ड्रिबलिंग, सिंगल चेंन, डबल चेंन,  शेवटी रिंग टाकणे हे घोटावून घेतले तर  पकड करताना, चेन तोडणे, रिंग तोडणे,  एक पाठ सोडून  बाहेरच्यावर अचानक सूर मारणे, खुंट्यावर घेणे आणि खुंटा मारणे याचे मास्टर झालो आम्ही. खरंच  सर आमच्या या ऑलराऊंड  होण्याला किती जबाबदार होते ते आज लक्षात येतंय. या सार्‍या ट्रेनिंग नंतर  सामन्यांमध्ये आम्ही भल्या-भल्यांची भंबेरी उडवायचो. चॅम्पियन होतो आम्ही. आमच्या मनात आम्ही चॅम्पियन आहोत ही भावना जागवली सरांनी. पुढे क्रिकेटमध्ये आम्ही मुंबईभर मैदाने गाजवली, तिथे ही चॅम्पियन ठरलो. कुठल्याही क्षेत्रात उतरायचे ते चॅम्पियन बनायलाच, हे सरांनी मनावर ठसवले. अगदी राडे करायचे ते ही  प्रोफेशनली . समोरचा गुंड असला  तरी त्याला धडकी भरली पाहिजे, हे तत्व. (सर स्वत: एकेकाळी मुंबईत, त्यातही भायखळ्याला भाईगिरी करून चुकले होते ! आम्ही हत्यारे कोणती वापरायची, कुठे आणि कसे मारायचे, स्वत:ला सेफ कसे ठेवायचे हे सारे सर सांगत.  हे सारे फक्त आले अंगावर तर घेतले शिंगावर यासाठीच.. हे बजावायचे. पुढे मुंबईतल्या काही मोठ्या भाईंशी नडायचा योग आला... तो सरांच्या  शिकवणीने निभावून नेला. मोठे पंगे घेतले. मुंबईच्या भाई सर्किटमध्ये ओळखी झाल्या.  नामचीन भाईलोक  नावानिशी ओळखू लागले.  ते तेव्हढेच ठेवले.

           सरांच्या वैयक्तिक आयुष्यात गावस्करबाई आल्या. त्यांनी लग्न केले.  आम्ही शाळा सोडून पुढे गेलो तरी शाळेत खेळ शिकवायला आणि स्पर्धा निमित्ताने जाणे व्हायचे.  सर म्हणायचे, तुमच्यासारखे मातीत घोळायला तयार नाही कुणी. ही पोरं  नाही तेव्हढ्या दमाची.  मग सर रिटायर्ड झाले. भायखळ्याची राहती जागा भाच्याला दिली आणि सातार्‍याला गेले. मध्ये 2005 ला आम्ही सार्‍या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर ठरवले, शिक्षकांना बोलवायचे ठरले. सार्‍यांचे  संपर्क मिळवले. सरांना सातार्‍याला फोन केला तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नसायची. फोन गावस्कर बाईंनी घेतला. सरांना म्हणाल्या आभास आहे फोनवर. सरांचा आवाज आला दे, मला आठवतोय तो !  भरभरून बोलले. प्रकृतीमुळे येता येणार नाही म्हणाले. मग आम्हीच  सातार्‍याला जायचे ठरले. गावस्कर बाईंना म्हणालो,
"सर आवाजावरून वीक वाटताहेत.. काळजी घ्या त्यांची."
बाई म्हणाल्या, "सरांना काय होतंय, त्यांची काळजी घ्यायला मी आहे ना खमकी !"

     अशा खमक्या बाई थोड्याच दिवसात... सरांच्या आधीच गेल्या. सर एकटे पडले... मुल-बाळ कोणी नाही. पुन्हा भायखळ्याला भाच्याकडे येऊन राहू लागले. आणि परवा अचानक आशीष महाजनने फोन केला... सर परवा गेले. मी जाऊन येतोय...तू येतोस का?  कामामुळे जमले नाही. तो  गेला आणि सरांचा फोटो घेऊन आला. इथे टाकावा न टाकावा... म्हातारपण कुणाला चुकलंय ... पण आमचा शेर... आमचा हीरो... अमजद खान, आम्हाला तसाच लक्षात ठेवायचा होता.. दाढीधारी, कुरळ्या केसांची बट तश्शीच. तसंच ते मान तिरपी करून भेदक नजरेने गिळून टाकणे. कणखर, दणदणीत ! पण इथे हा फोटो देतोय तो जबाबदारी म्हणून. सार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे  अंतिम काळातले दर्शन व्हावे म्हणून. 




     पवार सर-  उत्तरायुष्यातील फोटो.



सर मला खात्री आहे की स्वर्ग आणि इतर यांच्यात वर खेळांचे सामने सुरू असतील. तुम्ही देवांना पकडी, युक्त्या शिकवत असाल. देव आणि दानवांच्या राड्यांत कुठली हत्यारे वापरायची, कुणाला कसा घ्यायचा,  राख कशी द्यायची हे तुम्ही शिकवल्याने देवांचा विजय अटळ असेल. रंभा, उर्वशी आणि इतर अप्सरांना तुम्ही घाटी लेझिम शिकवला असेल... आणि असा  प्रकार स्वर्गाने गेल्या लाखो वर्षांत पाहिला नव्हता.. हे इंद्राला देखील मान्य असेल.. सरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

                                                                                                             

  -  आभास आनंद 
  आक्टोबर 2012


















Friday, October 26, 2012

बोले तैसा चाले ...



    सकाळी सात अट्ठेचाळीस ला  भाऊ ताजा होता पेटलेला होता,
अरे, एवढी जर  लाज असेल ना आपल्या मराठीपणाची, तर वाढवा दाढ्या आणि….
पुढले वाक्य भाऊ स्पेशल आहे. भाऊ पेटला का असाच बोलतो भाऊची बखर छापायची ठरवून सेन्सॉरबोर्डात टाकली तर एकही वाक्य पूर्ण छापता येणार नाही.  पुन्हा बखरया शब्दावरसुध्दा भाऊचा आक्षेप असेलच! ख्खी सात अट्ठेचाळीस  भाऊची नजाकत आणि अदा,  अदब से पाहत होती. अख्खं कम्पार्टमेंट बोरीवली  ते दादर रोज  (रविवार सोडून) असंच असतं.

अरे पण  हिंदी पिक्चर पहायला आवडतात म्हणून काही लगेच आमच्यावर शस्त्रक्रिया करायची गरज नाही.
णखी एक चावी! भाऊने ढापण्या फडफडवल्या
अरे पण हा साला नाना, मराठी  चित्रपट डफ्फर असतात म्हणतो! म्हणा! तुम्हाला सगळे खान लोक ....  पुन्हा तेच!

     काय झालं होतं, सकाळी  सात अट्ठेचाळीसने बोरीवली सोडता-सोडता कुणीतरी मराठी चित्रपटांची करुन टाकली होती. भाऊची अस्मिता वगैरे दुखावली गेली होती  आणि मायमराठीतून अस्खलित पट्टा सुरु झाला होता
अरे आपल्या अरुणने श्वासकाढला! श्यामची आई नंतर पहिल्यांदा सुवर्णकमळ ! आता ऑस्करला चालला अरुण, आणि तुम्ही .... रडा!

भाऊला सबंध छापणं अशक्य आहे मचे एक मित्रवर्य अरुण नलावडे मराठी चित्रपट निर्मितीत उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विजेते ठरले होते. श्वास बध्दल काय लिहावं? जिथे आणि जेवढा असायला हवा तिथे नेमका आणि तेवढाच भिडणारा श्वास टाक्षाने मेलोड्रामा टाळणारा श्वास.  मोशन्सचं धुणं धोबीघाटावर नेऊन पिळ पिळ न पिळणारा श्वास. गाण्यांचे मार्केट बाजूला ठेवणारा अव्यवहारी श्वास. प्रत्येक प्रसंग जरा ही न लांबवता कट्स साधणारा श्वास. साध्याशा कथेतून जीवनावर मोठे भाष्य साधणारा श्वास. रंच श्वास मराठी चित्रपटांसाठी श्वासच ठरला आहे. या पार्श्वभूमीवर नानाचे वाक्य पचणे भाऊला जड जात होते.
 तू सांग ना! मराठी लेखक म्हणवतोस ना स्वत:ला?
पारधी, भिल्ल, भटके आणि विमुक्त, या  कॅटॅगरीत भाऊने मला यूं टाकले.
मराठी चित्रपटांबध्दल तुझे काय मत आहे?

     मराठी चित्रपटांनी  आणि संतांनी, एकेकाळी स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घोतला होता असे माझे ठाम मत आहे. दोघांनी ही नको त्यांना, नाही ते समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण हे भाऊला सांगून उपयोग नव्हता.
  
सध्या आपल्याला बरें दिवस आलेत. मी डिफेन्सिव!
तसं नको! मला सांग तुझा आवडता लेखक कोण?.. आता बघा सांगेल शेक्सपिअर नाहीतर हॅम्लेट!
भाऊने सर्वांवर विजयी नजर फिरवत एकमेव ज्ञात विदेशी साहित्यिकाला त्याच्या अपत्यासह मध्ये घोतला.
तसे बरेंच आहेत.. हॅम्लेट लेखक का नव्हता ? पुढे भाऊ नामक प्राणी आपल्यावर घसरेल म्हणूनच!
सगळे  परदेशी! मराठी एकतरी आहे का?
होते. एक भाऊ पाध्ये म्हणून..
आता हा भाऊ कोण?
आपल्याला एक हमनाम प्रतिस्पर्धी आहे हे भाऊला ठाऊकच नव्हते
अरे, ते मराठीत फार शिवराळ लिहायचे!
कुणीतरी मूलभूत माहिती पुरवताच,
म्हणूनच याला आवडत असणार! …. काय वेळ आलीय पहा मराठीवर!
भाऊ पुन्हा उधळला

 भाऊ पाध्ये आवडतात हा अजून एक साहित्यिक गुन्हा! समकालिन मराठी साहित्यिकांत एकमेव वेगळा आणि म्हणूनच भावणारा लेखकं ज्याच्या  कथेतील अनुभव आपल्याला सरळ छेदतात आणि कथेचा, तिच्या तटस्थ अविर्भावासह प्रवाह पाहून वेडं व्हायला होतं असलं भन्नाट प्रकरण! आपल्या लक्षात त्यांच्या शिव्याच राहिल्या! आणि भाऊंचाही संतझाला! यांच्या शिव्या आणि त्यांच्या ओव्या! आणखी आपण काय लक्षात ठेवलंय?
आता बोल ना! मराठी साहित्यिक म्हणवतोस ना स्वत:ला!?
भाऊच्या तमाम शिव्या मी  हसत झेलतो, पण  ही  सहन होणं शक्य नव्हतं!
शिव्या देऊ नकोस! मुद्द्याचं बोल!
माय रिवेंज टुवर्डस कंटेम्पररी मराठी लिटरेचर!
..आणि पोरीला कुठे टाकलीयस? इंग्लिश मिडियमलाच ना! अरे, या चोर लोकांनीच तर मराठीची पार काशी करुन टाकलीय!

मग कुणाकुणा लेखकाची मुले फॉरिनला आहेत, त्यांना मराठी अजिबात येत कसे नाही याची फोडणी मिळाली. प्रत्येक मराठी लेखकांने मायमराठीच्या ओसरीवर आपापली पोरे-बाळे बळी चढवलीच पाहिजेत असा एक निष्कर्ष सभेत एकतर्फी पास झाला. बहुतेक मतदाते लेखक नसल्याने त्यांनी आपली मुले अमेरिकेत पाठवण्यास काही हरकत नाही हे एक उपकलम होतेपण मी एकटाच होतो!

अशानेच आपली भाषा बाटवली जातेय! संस्कृति  बरबाद होतेय-
णि धर्म बुडतोय! एकमेव  कट्टर हिंदूने संधी साधली.
अफगाणिस्तानात जाऊन रहा!  हिंदूंचा मूलतत्ववाद!
दादर येईपर्यंत हा संवाद वेगवेगळया मार्गाने मराठीची वाट लावणार्‍यांवर करवादत होता दादर आले आणि भाऊ उठून दाराकडे सरकला,
उतरनेका है क्या?

     मला माहीत आहे, स्थल कालाचा तक्ता बदलून असे प्रसंग जागोजागी घडतात. आमच्यावर तर नेमाने बेततात. मराठीत चुकून काही लिहिलं तर तो गुन्हा ठरलेला आहे. म्ही काय जपायला पाहत आहोत?

     मागे एका नाटकाला इंग्रजी नाव दिले, समर्पक होते आणि गर्भितार्थ साधत होते.  
मराठी नाटकाला इंग्रजी नाव कशाला? मराठीत काय चांगली नावं मिळत नाहीत? एक ज्येष्ठ साहित्यिक.
त्यानी त्या नाटकाला एक दोन मराठी नावं सुचवली. एकंदरच कठीण होतं!

मराठी  भाषा शुध्द लिहिली गेली पाहिजें !
म्हणजे कशी?
ती शुध्द बोलली गेली पाहिजे!
पुन्हा!? शी?
भाऊचा आणि मराठीच्या अस्तित्वाचा संबंध काय? भाऊने स्वत: सोडून इतरांना मराठीचे कातिल ठरवण्यामागचे सायको ऍनॅलिटिकल रीजनिंग काय? भाऊला सांस्कृतिक दादागिरी करण्याचा परवाना कुणी दिला? असे प्रश्न इथे विचारायचे नसतात. कारण आपली परंपरा उज्वल आहे, इतिहास सोनेरी आहे आणि साहित्य अत्युच्च दर्जाचे आहे!
  
     आज जिला मराठी  म्हणायचे ती काही शतकांपुर्वी ‘मराठी’ या नांवाने प्रचलित तरी  होती का? त्या आधी कुठे होती? वापरात होती? एकूणच मराठी भाषेत परभाषेतून आलेले शब्द किती? ती कधी शुध्द होती का? किंबहुना आज जशी आहे तशी अवघ्या पन्नास वर्षंपुर्वी होती का? आजही ती सार्‍या महाराष्ट्रात एकाच पध्दतीने बोलली जाते का? या सार्‍यांची उत्तरे ‘नाही अशी आहेतं जगातील कुठलीही भाषा मुळात बोली असल्याने कोणत्याही काळी शुध्द असूच शकत नाही. णि जी नाहीच आहे ती शुध्दता टिकवायचा कोण सोस!

     मला वाटते, जेव्हा आपण मराठी भाषा आणि तिच्या शुध्दी विषयी बोलतो तेव्हा आपल्याला कागदावर लिहिली जाणारी लिपी आणि प्रचलित व्याकरण अभिप्रेत असते, बोली नव्हे. णि जी शुध्दता जपण्याचा आग्रह होतो ती फारतर पाच पन्नास वर्षें प्रचलित असतें. पुन्हा बोलीनुसार व्याकरणालाही कालांतराने बदलावेच लागते. याचे दाखले कोणत्याही पन्नास वर्षे जुन्या पुस्तकात मिळतील. मग पन्नास वर्षांहून मागे जे व्याकरण  अस्तित्वात होते ते आज अशुध्द मानायचे का? किंवा पुढे पन्नास वर्षांनंतर जी पध्दत अस्तित्वात असेल, ती जास्त शुध्द असणार आहे का? (केवळ उपयुक्ततेचा निकष लावायचा म्हटले तर प्रत्यक्षात या लिपीच्याच शुध्दिकरणाची आज गरज आहे, जेणेकरुन ती आजच्या डिजिटल की-बोर्डवर सुटसुटीतपणे बसवता येईल) बेसिक की-बोर्ड इंग्रजी वर्णमालेवर बेतलेला असल्याने ही आजची गरज आहे, असो.

     आज आपण मराठीकडे कशा नजरेने पाहतो किंवा पाहता येईल, यावर विचार करुया. ज आपल्याला वाचनाचा कंटाळा आहे, किंवा वाचायला वेळ नाही. पुस्तकं कोण लिहितात किंवा ती कोण छापतात, यापेक्षा ती कोण वाचतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मराठी पुस्तक जाते ते मुख्यत: ग्रंथालयात, लायब्ररीत. एक प्रत सरासरी हजारभर लोकं (वाचली तर) वाचतात. हा डिजास्टरस रेशो आहे आणि तो बदलणे शक्य नाही. यामागे दोन कारणं असावीत एकतर जेवढे फुकटात मिळेल तेवढेच साहित्य वगैरे वाचायची  आपली मानसिकता किंवा जे छापले जातेय त्याची किंमत पुस्तकावर  छापलेल्या किंमती एवढी नसण्याची खात्री. मग ठोस ग्राहक नसल्याने ग्रंथालयांच्या जीवावर तगणारी प्रकाशने. मग कमी प्रतिंचे एडिशन छापले जाणे, त्यामुळे पुस्तकाची किंमत वाजवीपेक्षा जास्त होणे आणि त्याच मुळे त्यांचे मुख्य ग्राहक ग्रंथालयेच असणे हे चक्र सुरु होते. पल्याकडे सर्वात जास्त कोणती पुस्तकं विकली जातात ? तर धार्मिक! हे सांस्कृतिक दारिद्रयाचे लक्षण आहे! त्या मागोमाग क्रम लागतो शैक्षणिक पुस्तकांचा. शिकून नोकर्‍या मिळवणे हा तर आमचा धर्म! शेवटी आम्ही! जे किती विकले जाईल याची शाश्वती नाही असे पुस्तक काढतांना प्रकाशक काय पाहतो? पुस्तकाच्या रचना आणि दृष्य रुपात  दर्जावार कुठलीही तडजोड करायची नाही. कागद, छपाई वगैरे उत्कृष्ट असली पाहिजे, कमिशन दणदणीत दिलेच पाहिजे, अ‍ॅडजेस्ट कुठे कराल? लेखकाच्या मान (अवमान) धनात!  मग दर्जाच्या मानधनाला दर्जाचे लेखक. चले-चलो भई चले चलो! लेखक कशाला लिहिल?खाजहा सन्माननीयअपवाद!

     मी  का वाचायचे? जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत भाषांतरीत होऊन आले तर मी वाचायचें, ओके. पण राजकीय, क्रीडा (अर्थी क्रिकेट) आणि नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकांनी थापेबाज चरित्रे लिहिली तर मी का वाचायची? खांडेकर-फडक्यांच्या फॉरमॅटमध्ये कादंबर्‍या भरघोस येतात. लग्न हे ज्यांचे एकमेव साध्य असते, त्या मी का वाचायच्या? वरकस जमिनीत तण माजावं, तशी कविता माजलीय! ती मी का वाचायची? ज्यांच्या उपजिविकेचे मुख्य साधन नोकरी आणि रविवार आरामखुर्चीत जातो त्यांच्या अनुभव विश्वाचं व्हॉल्युम काय? त्यातून किती कसदार साहित्य निर्मिती होऊ शकते?आणि झाली तर ती वाचणार कोण?

     हे सारं बदलता येईल का? आणि कसें? आज आपले मराठी तंत्रज्ञ जगभर अनेक सॉफ्टवेअर्स बनवत असले तरीही मराठी ऑपरेटिंग सिस्टम अजूनही अस्तित्वात नाही कारण ग्राहकच फुकट्या आहे - क्रांतिचे वारें माय मराठीला अद्याप लागलेले नाही -बुक्स, ई-न्युज किंवा ई-मॅगझीन्स  आम्ही कधी प्रचारात किंवा प्रसारात आणणार? जर निर्मिती खर्च कमी झाला तर नक्की कसला दर्जा  सुधारणार? आज मराठीच्या रचनेसाठी साधी एक स्टॅन्डर्ड की बोर्ड प्रणाली अस्तित्वात नाही ऑटो स्पेलचेक सारख्या सुविधा पॅकेज ओरिएण्टेड आहेत. मराठीत ऑनलाइन केलेली  कामें  ट्रान्सपोर्टेबल नाहीत. बाजारात उपलब्ध फॉन्टसही पन्नास साठ प्रकारचे आहेत, त्यांची एकमेकांशी सुसूत्रता नाही आणि बरेचसे परिपूर्ण ही  नाहीत. एकाच भाषेसाठी सॉफ्टवेअर बनवणार्‍या कंपन्या एकमेकांना पाण्यात पाहतात. सुसूत्रता येणार कशी?

पण परिस्थिति कितीही प्रतिकुल असली तरीही कुणीतरी पुढे जाणे गरजेचे आहे. वाचकांनी, ज्यांच्या घरात आज संगणक आलेलाच आहे, त्यावर वाचनाची सवय करुन घ्यायला काय हरकत आहे? आपले लेख संपादकांपर्यंत आणि अंक वाचकांपर्यंत सॉफ्ट कॉपीमध्ये जायला काय हरकत आहे? दहा ग्रंथालये भरतील एवढी पुस्तके एका छोटया डिस्कवर राहणे शक्य आहें असे संग्रह घरोघरी होतील का? संदर्भ म्हणून अख्खे ग्रंथालयच आपल्या दारी हजर असेल का? मराठी साहित्याचा ओघ परभाषेत रुपांतरीत होऊन देशी विदेशी जाईल का? मराठी लेखक  फेरारीमधून फेर्‍या मारेल का? स्वप्नांचं बरं असतं, इमले बांधायला पायाची गरज नसते! पण जोवर स्वप्न फुकटात पाहता येताहेत तोवर मी  ती पहाणारंच! किती झालं तरी मी मराठी आहे! सर्वच क्षेत्रात होत असलेल्या संगणकीय महाबदलांचे मी हारातूर्‍यां शिवाय स्वागत करणार! या दृष्टीने  आम्ही मराठीने  डिजिटलप्रकाशन सुरु करुन पुढे पाऊल टाकलेले आहें त्या निमित्ताने आम्ही मराठीलाहार्दिक शुभेच्छा
                                 
                                  - आभास आनंद
                                   आम्ही मराठी - दिवाळी २००४