Friday, January 6, 2012

बालनाट्यांच्या जंगलात !


सुस्वागतम् , रंगशारदेला वंदन करून आणि बाल रंगभूमीसाठी तन, मन आणि धन अर्पण करून, वर्षानुवर्षे बाल प्रेक्षकांचे रंजन करणार्‍या समस्त दुर्लक्षित रंगकर्मींना विनम्र अभिवादन करून, शलाका थिएटर्स, मुंबई सहर्ष सादर करीत आहे, ‘पॉकिमॉन्सच्या जंगलात’...

बाल रंगभूमीच्या मर्यादा अनेक आहेत त्यांचा काल, दिवाळी आणि उन्हाळी सुटया, फार फार तर एक किंवा दीड महिन्यांचे त्यांचे अस्तित्व. सकाळचे प्रयोग हौशी संस्था त्यामुळे होणारी तारखांची मारामार (चांगल्या तारखा मिळतात कशा? विचारायचे नाही, कारण मॅच फिक्सिंगपेक्षा हे प्रकरण ओवळे आहे.)  तरी ही एप्रिल उजाडला की बाजारात आंबा आणि नाटयगृहां जवळ शिबिरं दरवळतातच.

नाटयगृहाच्या आडोशाला एक शिबिर. त्यात प्रवेशासाठी अर्ज करणारे पालक रविवारी रांगेत आपल्या पाल्यासह उभे. हजार दीड हजार म्हणजे फार नाहीत हो.  मुलांना ऍक्टिविटी पाहिजेच की.  जगात आजकाल कॉम्पिटिशन किती आहे? मुलं स्मार्ट नकोत? प्रवेश देणारे तरुण स्वयंसेवक हवेत तरंगत फिरताहेत. मुलं बिचारी मम्मी किंवा डॅडीच्या हट्टापायी आलेली, भांबावून रांगेत उभी. पालक दोघे ही नोकरदार, मुलाला द्यायला आपल्यापाशी वेळच नाही, ही अपराधी भावना वागवत रांगेत उभे. बहुतेकांची इच्छा आपल्या लाडका/की ला एकदा तरी (शिवाजी, गडकरी, साहित्य च्या रंगमंचावर उभे राहिलेले डोळे भरून पहावे. अरे, त्या फळ्यांना काय सोनं चिकटलंय, पोराला तिथे उभं करायला? पण कल्चर रे बाबा! आम्हाला नाही मिळालं ना? म्हणून यांना, बरं!  म्हणून सुटी घेऊन, गावी किंवा आउटिंगला न जाता या बालयोद्ध्याना शिबिरात भरती केलं जातं.

शिबिर संचालक अनुभवी. अनेक वर्षे हेच काम केल्याने कॉन्फिडण्ट (पक्षी उध्दट) झालेले.  त्यांचेही नाव आहे हेतू रंगभूमीची सेवा... क़ोण तो,(आणि खाणार मेवा) म्हणून खुसखुसतोय? पैसे घेतल्यावर जबाबदारी ही आलीच मुलांना प्रशिक्षित करणे आणि रंगमंच देणे थे खर्च आलाच.  घोळ आहे तो इथेच. इथेच सुरू होते बाल रंगभूमीचे अर्थशास्त्र.

शिबिरार्थींना प्रशिक्षण वगैरे देऊन झाल्यावर रंगमंचावर ‘उभे’ करणे अत्यावश्यक. त्या साठी नाटकं  लिहा रे कुणीतरी. शिबिर संचालक तज्ञ. धडाधडा नाटके लिहितात, भडाभडा रंगमंचावर ओततात. दर पंधरा दिवसांनी संस्थेची नाटकं बदलतायत. एका-एकाची, आठ-दहा नाटके सुरू. शिबिरार्थी बदलतात तसा नाटकांचा प्रेक्षक बदलतो क़ारण तोच तर टारगेटेड ऑडिअन्स. ओघानेच आले शिबिरासाठी मुलांनी आणि पालकांनी खस्ता आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिकिटे काढणे. सकाळच्या प्रयोगासाठी पालकांसह सात आठच्या सुमारास हा ‘बालयोध्दा’,(याचे स्त्री लिंग काय?) जेवणाचा डबा,पाणी घेऊन घर सोडतो. प्रचंड गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये, बसमध्ये गनिमी काव्याने,जीव मुठीत धरून हा बालयोध्दा रंगभूमीच्या सेवेसाठी प्रवास करतो. चार पाच तास वातानुकुलित नाटयगृहात काढून, मे महिन्यातल्या भर दुपारी दीड दोन वाजता, लाल बुंद आणि घामाघूम होऊन कसे बसे, मिळेल तिथे डबा वगैरे खाऊन, घरी साधारण चार-पाच वाजता पोहोचतो.  या सर्व व्यापात सोबतचा पालक या उद्याच्या सचिन नाहीतर उर्मिलावर, स्वत:ला झालेल्या त्रासा द्धल डाफरतो, तुझ्यासाठी ! तुझ्यासाठी हे करावं लागतं!

आमच्या वेळी कोणी एवढं करत नव्हतं. तरी ही यांची तोंडं वाकडीच
सचिन-उर्मिला वगैरे सुरूवातीला ओशाळवाणे. मग त्यांनी पुढल्या प्रयोगाला जायलाच नकार देणे. त्यावर,
आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय तर... , ची उजळणी.
(खरं तर त्यांनी नाटकात काम करावं हा पालकांचाच आग्रह.)
पण पुढल्या प्रयोगाला पुन्हा याच अग्निदिव्यातून जायला सारे तयार. तरी ही कोणत्याही प्रयोगानंतर पाच- पंधरा आया-ताया,
आमच्या, ‘बंटी’ किंवा ‘पिंकी’ ला नाटकाची कित्ती- कित्ती आवड आहे, सांगते तुम्हाला; त्याला /तिला एकदा संधी द्या, मग बघा.
अशी आर्जवं संचालकांकडे करतंच असतात. अनेकांना संधी मिळवून देत-देत संचालक संधी साधतात. सुटी सुरू होताच प्रयोगाचे दिवस. जाहिराती इतक्या, की कोण म्हणेल बाल रंगभूमीची सद्यस्थिति दयनीय आहे? तात्पर्य, बाल रंगभूमीची चळवळ जोमाने सुरू आहे आणि मराठी रंगभूमीची उद्याची पहाट हेच रंगकर्मीं सोनेरी करणार आहेत. पण कशाला चिंता करायची? मुळात कुणी करायची? अखिल भारतीय संस्थांनी? की सरकारी सुसंस्कृत विभागाने? की व्यावसायिक निर्मात्यांनी ? अशी इथे-तिथे बोटं का दाखवायची? बाल रंगभूमी ,मे महिन्या पुरती तरी बाळसेदार आहे.

आमचं बालपण सुंदर बालनाटयं पाहत सरलं. पुल, तेंडुलकर, मतकरी, मोठ्यामोठ्यांनी इथे नाटके लिहिली, दुर्गा झाली गौरीतर युनिक. त्या आधी अलबत्या-गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस, अचाट गावची अफाट मावशी, वयम् मोठम् खोटम् किती नावं घ्यायची? आजच्या दिग्गजांनी तेव्हा ती साकारली. रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर, विनोद- लीला हडप, वर्षांनुवर्ष बालनाटय करत होते. तेव्हा टीव्ही नव्हता, मिडिआ फोफावला नव्हता,सीरिअल कॅन्सर मेंदूभर पसरला नव्हता. सासवा- सुनासुद्धा रोर पोहोचल्या नव्हत्या. लाकारांपाशी वेळचवेळ असावा. मग करायचे झालं बालनाटय. आजकाल टीव्ही सोकावला, सीरीअल्स माजल्या, परदेशातून टून्सची प्रचंड आयात झाली.  आमचे बालनाटय तिथेच! नव्हे तिथून नाहिसेच झालेले. प्रयत्न करणारे रंगकर्मी उपेक्षित. (मेनस्ट्रीमच्या दृष्टीने जणू क्लास फोर.) त्यांना ना अवॉर्डस्, ना सरकारी अनुदाने, ना प्रेक्षक.  तरी काही जण पंचवीस-तीस वर्षे बालनाटये करताहेत. हॅटस् ऑफ टू देम! त्यांच्या खीसा जर रिकामा झाला, त्यांनी काय करावं? चळवळ तर सुरू रहायला पाहिजे. मग पुन्हा तेच अर्थशास्त्र.

बाल रंगभूमीच्या समस्या अनेक आहेत. मात्र त्यांच्या वाटयाला मी स्वत: कधी जाईन असं वाटलं नव्हतं. हाती असलेल्या लेखन कामाठीतून (लेखकाला कामाठी असा पूरक शब्द समजावा.) बालनाटय करण्याची इच्छा अन्यथा मला का व्हावी? माझ्या मित्राने, प्रदीप साळुंकेने हे नाटक लिहिले आणि करायचे ठरवले. धीच्याच वर्षी राजा सिंह आले होते. त्याचाही हिशेब चुकलेला.  तरी ही, ‘बाल प्रेक्षकांना एक चांगले नाटक देऊया., या इच्छेने हा प्रवास सुरू झाला. बालनाटय करायचं तर मुलांना फसवायचं नाही, त्यांना एक व्यावसायिक दर्जाचे नाटक देऊ, संपूर्ण नाटयानुभव देऊ असा विचार केला) पहिल्याच झटक्याला शिवाजीमंदीरसमोर एकाने-

हे कसले डोहाळे लागलेत बालनाटयाचे? हा प्रश्र्न केला.        
तुला काय कामं नायत इन्डस्ट्रीत, तर बालनाटय करतोयस?
यावर बालनाटय हा माझा जगायचा धंदा नाही हे पटवायला मला त्याला डीपीत न्यायला लागलं असतं.
राजा सिंह माहित्येय काय? एवढं सॉलिड नाटक , पण विनय धुपला. तुला कोण उभं करणार?
आमचा हिशेब सुरू,
प्रदीप बघ, कितीला धुपायची तयारी आहे?
मुलांना एक चांगलं नाटक मिळणार असेल, तर मी धुपायला तयार आहे.
प्रदीप तसा सर्किट डोक्याचा माणूस. त्याला आधी धुपायला तयार केला. नंतर विचार सुरू केला. रिस्क मॅनेज करता येईल का? कोणत्या ही नाटकाचा लेखक जसा मरेस्तोवर री-राइटस् करतो, तितकी री-राइटस् प्रदीपने निर्माता असून केली. नाटकात पाच गाणी, त्यांना पाच वेगळी ट्रीटस् द्यायचं ठरवलं. केवळ व्यावसायिक दर्जाचे रेकॉर्डिंग नको होते. मला त्या गाण्यांचा दर्जा मुलं चॅनल वर ऐकतात त्या संगीतांपर्यंत न्यायचा होता.  प्रदीपच्या मदतीला धावून आले सुदेश पाटिल, बाळा मुणगेकर, प्रदीप चिपकर पारंपारिक, फोक, वेस्टर्न, फ्युजन, या लोकांनी काही बाकी ठेवलं नाही. ‘अपर्णा अपराजित’ ने दोन सुंदर गाण्यांचं सोन केलं ‘प्रीति तोरणे’ या टीमची तेंडुलकर. गाते सुंदर, स्टेजवर वावरते भन्नाट. टायमिंगचा सेन्स तर एवढा परफेक्ट की एक हाती नाटक खांद्यावर वाहून नेईल. खरंच तिने खूप पुढे जावं.


रीहर्सल दादर- माटुंग्याला, म्हणजे मुलं तिथलीच हवीत. पण पॉकिमॉन्सच सापडेनात.
बालनाटयाच्या मिस्मॅनेजमेण्टचा अनुभव असलेले सगळेच येनकेन प्रकारे नकार देत होते. त्यात आमचे शिबिर ही नाही. मुलं शिबिरातली नाहीत म्हणजे त्यांचा खर्च आपण करायचा. इथे नाटकाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग, डबिंग, रिमिक्सिंग बजेट ,मराठी आल्बमच्या बजेट एवढे झालेले. मग तालिमीतली कोरिओग्राफी. मला स्टिरीओ टाइप कोरिओग्राफर नको होता. मग आला कुणाल.  शिक्षणाने प्रॉडक्शन इंजिनिअर, पण ऍनिमेशन व्यवसाय म्हणून स्वीकारणारा हा मुलगा अप्रतिम कोरिओग्राफर आहे. पाच गाण्यांसाठी डान्स कोरिओग्राफी त्याने एका दिवसात केली! त्याची पावती त्याला सर्व समिक्षकांनी दिलीच आहे. हाच कुणाल बाप व्हिज्युअलायझर आहे. पॉकिमॉन्सची ती भन्नाट ऍड त्याचीच.

इथे नाटक सेट झाले तरी पॉकिमॉन्सचा पत्ताच नाही. मुलांच्या परिक्षा, त्यातून खरे पॉकिमॉन्स चौदा एप्रिलला हाती लागले. वीस तारखेला नाटकाचा शुभारंभ. टीव्हीवरले पॉकिमॉन्स अचाट करामती दाखवणारे. हाडामांसाचे पॉकिमॉन्स रंगमंचावर कसल्या करामती दाखवणार? ते हवेत उडाले तरीही टीव्हीच्या तुलनेत मुलांना त्या करामती पोरकटच वाटणार. मग ठरवलं, पॉकिमॉन्स रंगमंचावर मूर्खपणाचे चमत्कार करणार नाहीत. नाटकाचा फोकस पॉकिमॉन्सवर ठेवूनच त्यातले नाटय दुसर्‍या बिंदूंकडे वळवायचे

तालमीतच दादर माटुंगा कल्चरल सेन्टरच्या रानडेंनी आणि सुरेश खरेंनी दाद दिली,
हे कसं शक्य केलंत? हा त्यांचा सवाल.  

पहिलाच प्रयोग ‘ठाणे गडकरी’ ला अहो आशचर्यम्! बाहेर बाल प्रेक्षकांची ही...  रांग.
आमचे पाहुणे पास शिवाय उभे. शेवटी विंगेत खुर्च्या टाकल्या.  नाटक रंगत गेले. मुलांना प्रचंड आवडत होते. आपल्याला समाधान, जे ठरवलं ते केलं. सर्वांनी बालनाटय सीरीअसली घेतलं होतं. सर्वांनी म्हणजे नाटक करणार्‍यांनी, मदत करणार्‍यांनी आणि बालप्रेक्षकांनी. ता मिडिआ-पब्लिसिटी. मागोवा घ्यायला सुरूवात केली. शोध लागला, बालनाट्याची समिक्षाच होत नाही. काही यायला फोनवर तयार शेवट पर्यंत आलेच नाहीत. सकाळी अकराचा शो, पत्रकारांसाठी त्रासाचा. सं जमणार यायला? पत्रकार येईपर्यंत मे महिना संपत आलेला. नाटक बंद करायची वेळ आल्यावर समिक्षा. एक चांगला प्रयोग होतोय हे लोकांना कळायच्या आतंच नाटक बंद करायची वेळ आलेली. अपवाद जयंत, संजय डहाळे सारख्या हितचिंतक, पत्रकार मित्रांनी दाखवलेली आस्था. पण दोस्तीत थँक्स द्यायचे नसतात. प्रेस शो ला आले रत्नाकर पिळणकर. दहा जणांपैकी एकटेच. काही समिक्षक मित्रांनी बालनाटय पहायलाच सरळ तोंडावर नकार दिला.

पण नाटक धरले. मुलांचा प्रचंड जोश त्यात दुसर्‍या अंकात राक्षस आणि मुलांच्या ‘क्वीझ कॉन्टेस्ट’ मध्ये मुलं अक्षरश: नाटकात सामिल व्हायला लागली. नाटकाचा शेवट तर इन्टर ऍक्टिव्ह.  पॉकिमॉन्स बाल प्रेक्षकात सामिल झालेले. मुलांच्या चेहर्‍यावर आनंद आणि हसू पाहून आपल्याला समाधान. ते थोड्याच वेळात विरले. बालनाटयाच्या जाहिरातीचे बजेट नाटकाच्या खर्चाएवढे.  इतर सर्व खर्च जवळजवळ तेवढेच, पण तिकिट दर मात्र माफक.  बाल नटांना मानधन-प्रवासखर्च द्यायला नको? त्यात नाटक चालले की पाडणारे आलेच. ही नाटकवालीच (?) मंडळी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहिले.
मग ऑडिओ-व्हिडिओ राटस. गाण्यांचे सोडा, नाटकाचेव्हिडिओ राइटस् घ्यायला कोण तयार नाही. का? तर, ‘राजा सिंह’ च्या सीडीज् जात नाहीत! काय मार्केटिंगचे ज्ञान! ज्याला पॉकिमॉन्स मधली मार्केट कॅप्चर करणारी स्ट्रेंग्थ दिसत नाही ते व्हीसीडीच्या व्यवसायात.

बालनाटय सीरीअसली कोण करेल आणि का करेल? मनस्ताप तेवढाच आणि उत्पन्नाची आशा शून्य. बालनाटयाच्या समस्या आधी कोणी मांडल्याच कुठे आहेत? आणि कोणासमोर मांडायच्या? बालनाटय परिषदेच्या समिती सभासदांना बोलावून पाहिलं, ते स्वत:च्याच नाटकांना अनुदाने आणि प्रयोग मिळवून देणयाच्या विवंचनेत. नाटय परिषद? ते स्वत:च सरकार-दरबारी कटोरा घेऊन उभे. सरकार दरबारी भीक मागण्यात मराठी चित्रपट आणि नाटयसृष्टी मग्न. बाल प्रेक्षकांचा विचार करायचा कोणी? बालनाटय करणारे रंगकर्मी नाहीत का? का ते कोणीतरी भटके आणि विमुक्त आहेत? त्यांना कोण आपलं मानणार? मोठया नाटयसंस्थांना एखादे बालनाटय करण्याची इच्छा का होत नाही? चित्रपटाला आर्थिक पाठबळ देणारे सरकार, बालनाटयाला सहज मदत करू शकेल पण तसा ठराव मांडायला कोणी प्रतिनिधीच नाही.

मग बाल प्रेक्षकांच्या वाटयाला कोणती करमणूक येते? सुरेश खरेंना मी म्हणालो होतो की आपल्याकडे मुलांसाठी जेवढी म्हणून करमणूक आहे ती आयात केलेली. पले स्वत:चे काहीच नाही.  पॉकिमॉन्सही शेवटी आयातच केलेले. आपल्याकडे बालप्रेक्षकाला मार्केट मानलेच जात नाही. त्याच्या बौद्धिक कुवतीचा अंदाजच कुणाला नाही. ज बाल प्रेक्षकांसाठी जे नाटक होते ते करणार्‍या रंगकर्मींचे वय साधारण चाळीस ते पन्नास. ते कोणते नाटक करतात? त्यांच्या बालपणी त्यांना भावलेले. राक्षस, परी, चेटकिण, जादुगार आणि प्राणी हे त्यांचे अविभाज्य घटक. आजचा पाच वर्षांचा बाल प्रेक्षक आकलनाने तेव्हाच्या पंधरा वर्षाच्या मुला इतका स्मार्ट आहे, हे कुठेतरी समजून घ्यायला हवं. मग आपण त्यांना आपल्या काळात ओढून नेणे कितपत योग्य आहे? आमचं बालपण आणि आजचा बालप्रेक्षक यांच्या अनुभव विश्वात आणि आकलन शक्तिमध्ये प्रचंड फरक झालेला आहे. मोठयांना कदाचित उमगणार नाहीत अशा पंचेसवर बालप्रेक्षक मनमुराद हसतात हे कशाचे लक्षण मानायचं? आजचे रंगकर्मी रंगभूमीच्या भवितव्याची चर्चा तर करतात. बाल रंगभूमी महत्वाची नाही का? मग ती अशी उपेक्षित का?

सकाळी अकराची वेळ, शनिवार, रविवार सोडून. मुलांना न्यायचं कुणी आणि पालकांनी मुलांना नाटक दाखवायचं कधी? सात-आठ वर्षांची मुलं ‘सही रे सही’ पाहतात, त्यांना आवडतं. तीच मुलं बालनाटय पहायला येतात तेव्हा त्यांना आपण काय देतो? त्यांची फसवणूक होत नाही का? अशी फसवणूक करून कुणाचा आणि किती फायदा होतो? विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागात बालनाटय विभागाला काही स्थान आहे का? आणि जर आहे तर तिथून येणारे कोणी ही बालनाटय का करत नाहीत? बालनाटय प्रशिक्षण शिबिराचे महत्व आपल्या जागी आहेच. ते करणार्‍यांचा उद्देश जोवर मुलांना प्रशिक्षित करणे हा असेल तोवर काही प्रश्न नाही.  त्यांचे अर्थशास्त्र ही गरज म्हणूनच बनले आहे, तेही मान्य करू. पण जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर मृतप्राय झालेला रंगकर्मी बालनाटयाला पैसे कमवायचे आणि स्वत:च्या अस्तित्वाचे साधन मानतो आणि बाल कलाकार, त्यांचे पालक आणि नातेवाईकांना वेठीला धरून बालप्रेक्षकांची फसवणूक सुरू करतो तेव्हा खरी समस्या सुरू होते. हे बदलायचा प्रयत्न केलां... पण फेल!
                                 - आभास आनंद  
      आम्ही मराठी 
      दिवाळी-2005

Wednesday, January 4, 2012

मराठी नाटक, एक जग(व)णे !

असा एक ही मराठी माणूस नसेल ज्याने कधी तोंडाला रंग फासला नसेल!
प्राध्यापक नेसवणकर डी.पी.त माझ्या समोर बसत आपले आवडते वाक्य फेकते झाले. संध्याकाळी साडेसातला आपले  एक्स्ट्रा लेक्चर आटोपून ते आले होते. त्यांची आवडती स्ट्राँग नेस्कॅफे मागवून आम्ही डॉक्टरची वाट पाहू लागलो. मला आलेल्या रायटर्स ब्लॉकवर सल्ला हवा होता.
कोण म्हणतो वाईट दिवस आलेत? सगळं चांगलं चाललंय!
नेसवणकर नेहमी माझ्या विरुद्ध बोलणार!
अहो ते मराठी निर्माते बोलताहेत आता तेच बोलणार ना? पैसे लावतात ते!
लावा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय.पण नाटक म्हणजे सुपर लोट्टो असल्यासारखे लावू नका!
म्हणजे काय?” नेसवणकर इकॉनॉमिक्सचे तज्ञ असल्याने मी  जिज्ञासू झालो..
म्हणजे बघ, मराठीतले जे छोटे किंवा नवे निर्माते आहेत ते नाटकाकडे लास-व्हेगासच्या स्लॉट मशिनसारखे बघतात.
आणि जुने निर्माते?”
ते कन्फ़्युज आहेत. वेगवेगळे प्रयोग करुन पाहताहेत, कुठे यश मितंय का ते.
आणि तुम्ही म्हणताय सगळ चांगलं चाललंय?”
अरे कुठल्या ही व्यवसायात असे उतार-चढाव येतच असतात. त्यातून दरवेळी रंगभूमी आपल्या पद्धतीने मार्ग काढती झालीय!
आता तिचे मार्ग काढण्याचे मार्ग कसे होते हा प्रश्न अलाहिदा!आपल्या लॅपटॉपची लेदर बॅग माझ्या बाजूला आदळून डॉक्टरने प्राध्यापकांच्या शेजारी बैठक मारली!
कधी हीट अँड हॉट मार्ग, कधी ऑर्केस्ट्रा मार्ग, कधी लावणी मार्ग!
डॉक्टर हे वाक्य कडवटपणे म्हणाला असावा, कारण अजून कॉफी आली नव्हती आणि डॉक्टर कडवट झाला होता.
सध्या हा मार्ग संतोषच्या घरावरुन जातोय.मी काहीतरी मार्मिक बोलायचा प्रयत्न केला!
बोलू नकोस! अजिबात बोलू नकोस!नेसवणकर खवळले ,
संतोषने सद्यस्थितित मराठी नाटक जगवलंय!मी  काहीतरी कुत्सित बोललो असा त्यांचा समज दूर करावा म्हणून मी-
तसं नाही नेसवणकर-असं काहीतरी बोलतोय तोच ते आणखीच भडकले.
हेच! हेच कुजकं बोलणं! एक तर मला तू नेसवणकर का म्हणतोस?”
तुम्ही नेहमी माझ्या विरोधात बोलता म्हणून! मी नागडा, तुम्ही विरुद्ध पार्टी, म्हणजे नेसवणकर!” 
हे असे शब्दच्छल करण्यापेक्षा काही क्रिएटिव कर ना!
हो इथे कॉफीच्या वाफा सोडत वल्गना नकोत, काही नाटक-बिटक लिहून दाखव !डॉक्टरने ही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला.
हे बघ डॉक्टर, एकतर मी संतोष विरोधी मुळीच नाही त्यात कुठल्याही स्तरावर थिएटर करणार्‍याला मी आपला मानतो यात समांतरवाले ही आहेत."
बघ, पुन्हा कुजके बोल समांतर हा शब्द तू कोणाला पर्यायी म्हणून वापरतोयस मला कळत नाही काय?”
का हे वृथा आरोप डॉक्टर ?” मी शून्य तासात प्रश्न उपस्थित करावा तसा निरर्थक झालो,
नाटकात समांतर आणि व्यावसायिक अशा पोटजाती नाहीत.
पण तुम्ही व्यावसायिकवाले तसं समजता ना!
मी व्यावसायिक! कधी झालो!?” माझे भान हरपत चालले!
नाटकाच्या जाती-पोटजाती, भेद वगैरे काय... तुझ्या मते!
'तुझ्या मते' वर श्लेष देत प्रा. खर्जात.
माझ्या मते ला महत्व ते काय सर?  नेहमी तुमच्या मतांवरुनच तर माझं मत बनवतो मी !
यावर तिथे प्रचंड गदारोळ माजला! प्रा.आणि डॉ. दोघे ही पिसाळले!
तुझी मतं ती आमची मतं? काय वेड लागलंय! तुला एक तर मतच नाही आणि असलं तर ते वापरायचा अधिकार नाही! शिवाय तुझी तं एवढी भिकारचोट आहेत कि तुला कोण शिवाजी मंदिरच्या दारात पण उभा करणार नाही!
मला नाही वाटत तिथे लेखकाला उभं करण्याची प्रथा आहे.
आज मी स्लॉगिंगच करत होतो. या गदारोळातच कॉफी आली.
सांग, नाटकातला जातिभेद.
नेसवणकर कॉफी एवढ्या वेगाने स्टिर करत होते कि आत एक भोवरा तयार झाला. त्यात मराठी नाटक जातंय की राहतंय अशी मला भीति,
चांगलं, बरं किंवा वाईट नाटक असू शकतं, नंतर कळणारं आणि न कळणारं असे भेद येतात. मग चालणारंन चालणारं आणि शेवटी धंदा करणारंन करणारं असा भेद येतो.
धंदा! शेवटी तू जातिवर गेलास! नाट्य व्यवसाय आणि दारूचा धंदा याना तू एकाच पातळीवर आणतोयस!
नाही सर, हा खालच्या पातळीवर जाऊन शब्द वापरतोय, याला काय मी आज ओळखतो?”
कोण कशाचा अर्थ काय काढेल ते काय आपल्या हातात आहे? माझा विचारअर्थात कॉफी ढवळताना.
तो जो काय धंदा म्हणतोस, तो तू का नाही करत?”
कारणं माझा व्यवसाय वेगळा आहे.
डीपीत बसून सगळ्यांची करत बसणं…”
डॉक्टर तो माझा उपव्यवसाय आहे! त्यावर माझा इगो जगतो. ”
मी प्रामाणिक महर्षि.  
मला माहित्येय स्वत:ला मोठा विद्वान समजतोस तू ! तुझ्या दृष्टीने आम्ही दोघे ही मच्छर आहोत, काय सर?”
काही नाही! या माणसावर संस्कार झालेले नाहीत.नेसवणकर हताश.
स्वत:ला मोठं समजणं आणि इतरांना तुच्छ लेखणं याला दुसरं काय म्हणणार?”
याला जर संस्कार झालेले नाहीत असं मानलं तर सम्पूर्ण महाराष्ट्र असंस्कृत मानायला लागेल!
मी पुन्हा गदारोळ माजवला! आज आपली बॅट चालत होती!
उर्मट शिरोमणी, कॉफीतला राक्षस, रीकामचा हज्जाम.असे वाक्प्रयोग सुरु झाले.
आपण इथे कामासाठी जमलोय, सर. मी तुम्हाला इथे भेटायला सांगितलं ते मला कॉफीचे पैसे जास्त झाले होते म्हणून नाही. आणि मी नेमका काय आहे हे तुम्ही दोघांनी ही वेळोवेळी सिद्ध केलेलंच आहे.. तेव्हा आता मुद्धा?”
हां तू काय ते फॉर्मचं बोलत होतास…” मी थोडक्यात आणि पुन्हा मला आलेला ब्लॉक सविस्तरला.
ब्लॉक व्हायला तू काय  स्वत:ला तेंडुलकर समजतोस?”
ते ब्लॉक व्हायचे का नाही ते मला माहीत नाही, पण मला ब्लॉक व्हायचा अधिकार ही नाही हे जरा जास्तच झालं! मी नम्र निषेध नोंदवू ?”
परवानगी घेऊन मी सरळ कॉफी घटाघटा पिऊ लागलो. त्यावेळी प्राध्यापक आणि डॉक्टर मला न कळणार्‍या भाषेत काही अगम्य बोलत होते.
सररीअलिम!डॉक्टर ने तोडगा दिला.  
मान न मान, तू हा जो विषय मांडणार आहेस तो सररीअलिस्टिक आहे.
इथे मानण्या न मानण्याचा प्रश्नच नाही, सरळ- सरळ निर्णय आहे हा!
तुझ्यात हा जो उर्मटपणा आहे ना, त्याला हाच फॉर्म शोभेल.नेसवणकर.  
सर, आपण नाट्य विषयाला काय शोभेल याचा विचार केला तर ते आपल्या गंभीरपणाला शोभेल. पण आपण गंभीर झालो कि विनोदी दिसतो!
झालं! फॉर्म सांगितला तर लगेच तलवारी चालवायला लागला.”
तलवार नाही कुर्‍हाड, छोट्या वॉशिंग्टनला कुर्‍हाड मिळाली तर तो ती चौफेर चालवायला लागला!नेसवणकर,
मी मला जमतं का पाहत होतो..
जमेल! आम्ही कशाला आहोत? आम्ही तुला मार्गदर्शन करु, तुझ्या सार्‍या प्रसव वेदना सुसह्य करु आणि शेवटी तुझ्या नाटकाचं मढं  वर्ल्ड हेरिटेज म्हणून जतन करु…”
थँक्स, तुम्ही दोघं आहात म्हणून मराठी रंगभूमी अजून धुगधुगी धरुन आहे.
तुझ्या नावातच जे वीष आहे ना, त्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. सर,
तुला भेटायचं म्हणजे आम्ही घरुन अ‍ॅन्टीडोट घेऊनच निघतो.डॉक्टर. 
तसं नाहीए, कॉफीत वीष असतं ते माझ्या वीषावर उतार्‍याचं काम करतं. मग नाटक कुठे करु?”
रस्त्यावर कर!
कशाला तुमची संस्था आहे ना?”
ती रस्त्यावर येईल !
चालेल, आपण रस्त्यावरच करु !
नको, त्या पेक्षा तू व्यावसायिकला ट्राय कर! त्यांना आण.
त्यांना आता सरकारी अनुदान पण आहे. म्हणजे माझं नाटक करताना धुपलं तर सरकार धुपेल!
मी टाळीसाठी पुढे केलेल्या हाताकडे प्रा. तुच्छतेने आणि डॉ. तिरस्काराने पाहत होते म्हणून मी टेबलावरची माशी मारल्याचा आव आणला. मग्जच्या काळजीने वेटरची धावपळ उडाली.
मला सांगा नेसवणकर, नक्की प्रॉब्लेम काय झालाय.
कसला?”
या धंद्याचा?”
ते नक्की कुणालाच माहीत नाही.
हो तुम्ही दोघं सोडून !
एका अर्थी ते खरंय. आता मी जे सांगतो ते नीट ऐक, म्हणजे तुझ्या ज्ञानकक्षा विस्तारित होतील! मराठी नाटकाचा प्रॉब्लेम हा आज निर्माण झालेला नाही त्याचा एकूण परिणाम म्हणून आज चांगली संहिता दुर्मिळ झालीय खरी, पण हा अनेक वर्षांचा बळावलेला रोग आहे.डॉक्टर. 
म्हणजे कॅन्सर लास्ट स्टेजला जाऊन सिम्पटम्स दाखवतो तसा?”
हे कॅन्सरपेक्षा वाईट आहे.
मग हा रोग बरा करायला डॉक्टर लागेल, नाही, चांगलासा!
मी डॉक्टरला कचाटयात पकडला.
तो मी नाही, मी तत्वज्ञानाचा डॉक्टर आहे.
डॉक्टरने मराठी रंगभूमी क्युअर करायची जबाबदारी टकली.
हे दुखणं साधारणपणे सत्तरीच्या दशकात सुरु झालं.
काहीतरीच काय, तेव्हा तर चार-चार संस्था दणक्यात प्रयोग आणि दौरे करत होत्या.
मान्य. पण नाटकं कोणती होती? तीनच नाटककारांची अत्रे, दळवी आणि कानेटकर. त्यापैकी दोनच इहलोकी..तिसरा लेखक तयार करायचा कुणी? चांगल्या संस्थांनी वर्षानुवर्षे नव्या संहितांकडे पाहिलंच नाही. नव्या संहिता कपाटात कुजल्या.सर कदाचित आपला प्रदीर्घ अनुभव सांगत होते!
दहा वर्षांत लेखकांची एक पिढी संपली.
पण दुसरी पिढी तर आलीच ना? शफाअत,संजय, जयंत, प्रशांत, अभिराम, चेतनत्यांचं काय?”
तेव्हा वेगळाच प्रकार सुरु झाला. चार-दोन दिग्दर्शक स्वयंभू झाले. त्यांना नाटककाराचा क्राफ़्ट त्रासदायक व्हायला लागला. ते कथा विरहित संहितेची मागणी करायला लागले.
मग? मिळाल्या त्यांना तशा संहिता?”
त्यांनी बराच प्रयत्न केला. कादंबरीकारांपासून न लेखकांपर्यंत संहिता तपासल्या.. काही केल्या. त्याचा परिणाम काय झाला? या स्वयंभू दिग्दर्शकांकडे नाटककारांनी आणि नंतर निर्मात्यांनी पाठ फिरवली. त्यांना अकाली रीटायर्ड केलं. आम्हाला वाटलं होतं की काही काळाने हे एकत्र येतील, पण ते आलेच नाहीत, अज्ञातवासात गेले..
म्हणजे नाटककारांच्या एका अख्ख्या पिढीने दखलपात्र लिखाण केलंच नाही?”
नाही कारण स्वयंभू दिग्दर्शकांच्या दृष्टीने तो दखलपात्र गुन्हा नसता का झाला?” डॉक्टर.
त्या बदली आली दिग्द-लेखकांची एक नामी फळी. हे बेसिकली दिग्दर्शक, पण स्वत:ची नाटकं लिहून बसवायचा पायंडा यांनी पाडला. ते तिसर्‍या पिढीतल्या नाटककारांकडे पाहत ही नव्हते. ती पिढी गर्भातच जळून गेली. हा झाला आपल्याला क्रिएटिव्ह बाजूने लागलेला रोग.डॉक्टरचा अ‍ॅनालिसिस परफेक्ट होता.
          “आता आर्थिक बाजूने लागलेला रोग तपासून पाहू.नेसवणकरांनी इकॉनॉमिक्स सुरु केलं.
नव्वदच्या दशकात मराठी वाहिन्या सुरु झाल्या. आधी त्या फार नव्हत्या, त्यामुळे त्यांचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम लगेच लक्षात नाही आला. पण दोन-तीन वाहिन्या सक्रिय व्हायला लागल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली, दोन तीन बिझी कलाकारांना घेऊन नाटक करणं यापुढे अशक्य आहे. त्यांच्या एकत्र तारखा मिळत नाहीत आणि शो करण्याची कसरत करावी लागते. त्यात शूटींग्जमुळे दौरे आटोपते घ्यायला लागले. पुन्हा दोन-तीन चांगल्या कलाकारांनी एकत्र काम करावं अशा संहिता दुर्मिळ झाल्याच होत्या. मग नव्या लेखकांवर कसदार नटांची गरज राहणार नाही अशा संहिता निर्माण करायची वेळ आली. नव्या दिग्द-लेखकांनी ती चोख बजावली. अशा प्रकारे मराठी नाटक चांगल्या लेखक, दिग्दर्शक आणि नटांच्या एकत्र येण्याला पारखे झाले. मराठी माणूस एक तर नोस्टॅल्जिक, तो घाणेकर, दुभाषींच्या आठवणी मनात वागवत यायचा, नव्या परिस्थतितलं नाटक पाहून हिरमुसून परत जायचा. त्यापेक्षा घरी बसून पाहिलेल्या सीरीअल्सचा दर्जा जेव्हा त्याला चांगला वाटायला लागला, तेव्हा त्याने थिएटरला येणं बन्द केलं त्यानंतर मग नव्या दिग्द-लेखकांचा नवा प्रेक्षक तयार झाला आणि तू म्हणतोस तसं त्यांनी मराठी नाटक जगवलं किंवा तगवलं. अशा प्रकारे अभिजात कलाकृतीची अपेक्षा धरणारा प्रेक्षक आणि ती घडवण्याची कुवत असलेले नट, दिग्दर्शक आणि लेखक यांची नाळ एकमेकां पासून आणि मराठी नाटकांपासून तुटली. ती पुन्हा जोडणं केवळ अशक्य आहे. यात नाट्यव्यवसायाची बॅलन्स शीट जी आतबट्टयाची झाली तिला मराठी वर्तमानपत्राच्या जाहिरात दराने पूर्ण नामशेष केलं. आज मराठी नाटकांमुळे जर कुणाचा धंदा होत असेल तर तो फक्त मराठी वृत्तपत्रांचा. नाट्यधंद्याचा सगळा किंवा नसलेला फायदा आज वृत्तपत्र प्रकाशनांकडे जातोय. आणि ज्यांच्यापासून त्यांना अजिबात फायदा होत नाही त्या मालिकांचे सन्मान करण्यात ही प्रकाशनं मग्न आहेत. पुर्वी ही दोनच होती आज पाच आहेत.
सर आता इकॉनॉमिकल अ‍ॅनालिसिस मध्ये मग्न झाले होते. मी कॉफीचे बिल चुकवत  परिसंवादाची फिनान्शिअल स्पॉन्सरशिप लीगली पार पाडली.
आता बिल भरल्यामुळे मी काहीही बोलू शकतो असे मला नम्रपणे वाटते.
माझी सुरुवात. दोन्ही समंध त्रस्त दिसले.
नम्रपणे म्हणजे उद्धटपणे?”
हा ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.
आम्ही बाहेर निघालो तेव्हा गल्ल्यावर आणि डी.पी.भर आनंदीआनंद पसरलेला दिसला!
मुद्धा नंबर एक- मराठी नाटक लिहून फक्त अपमान आणि मनस्ताप नशिबी येणार असेल तर नाटक कोण आणि कशाला लिहील?  दोन- एका दिवसात गाण्यांच्या किंवा खाण्याच्या मालिकेचं शूटींग करुन दहा प्रयोगांचं मानधन बसल्या मुंबईत मिळवणारा कलाकार थिएटरच्या वाट्याला कशाला जाईल? तीन- गाव तिथे थिएटर अशी संकल्पना नगरपालिकेतले कल्पक लढवत असताना  पर युनिट कस्टमर (पक्षी प्रेक्षक) प्रयोग संख्या वाढवायला लागतेय आणि पर शो कस्टमर (पक्षी प्रेक्षक) कमी होतोय, हे गणित कसं बदलणार ? चार- लाखो रुपये कर्जात असलेला व्यवसाय फायद्यात अणण्यासाठी कॉर्पोरेट स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत ते कोण करणार? पाच- बाहेरगावी दौरे आणि कॉन्ट्रैक्ट शो करणारे दर्जावार घाबरलेत, त्यांना सक्रिय कसं करणार? सहा- नवरात्र-गणेशोत्सवातील नाटके बंद झाली आणि नकलांचे (!) प्रयोग रंगले ते शासकीय नियम आणि मंडळांची दिखावटी उत्सवप्रियता कोण बदलणार ? सात-” 
मी दरवाजा उघडला.
आता खाशील लाथ! स्वत:ला काय अमर्त्य सेन समजतोयस? उपाय कोण सुचवणार? प्रश्न उभे करुन  पळून जाणं ही मराठी माणसाची फार जुनी सवय आहे.नेसवणकर.
मराठी माणूस आर्थिक आणि व्यावसायिक डेप्थ असलेले प्रश्न विचारतो का नेसवणकर?”
तू आम्हाला grossly अण्डर-एस्टिमेट करु नको. एक तर उद्धट वर वर्णभेदी, या माणसावर संस्कार कोणी केले, त्याला पावनखिंडीत गाठला पाहिजे !डॉक्टर ऑपरेशन टेबलवर व्हावा तसा हिंसक झाला. प्राध्यापक नेसवणकर तर माझ्या नेसत्याला हात घालायच्या विचारात होते.
ज्याला स्वत:ला काही करता येत नसेल त्याने जे करताहेत त्यांना शहाणपण शिकवू नये. अशा माणसाला भर जिमखान्यावर निर्वस्त्र करुन झोडला पाहिजे.” 
नेसवणकर आपल्या नावातला पॅरॉडॉक्स साधू लागले.
मला काय फरक पडतो ? मी नावानेच नागडा आहे !
मग आम्हाला उपाय सांग..बाटलीतला राक्षस डॉक्टर.
कॅन्सरला उपाय असतो का डॉक्टर? तरी काही कॅन्सर पेशंट जगतातच ना?”  
मी इंजिनमध्ये जान फुंकली.
लक्षात ठेव, सररीअलि! काय?”
थँक्स डॉक्टर…” मी क्लच दाबत गिअर टाकला. सर्कलवर वळताना मी विचार करत होतो. अवघड जागी दुखणे आणि तत्वज्ञानी डॉक्टर, यावर उपाय काय ?
                               - आभास आनंद
                       आम्ही मराठी- दिवाळी २००६

       (हे नाटक कामगार राज्य नाट्यस्पर्धेत त्या वर्षी पहिले आले होते.)

*******